सर्वसामान्यांना फटका, गृहिणींचे बजेट कोलमडले
प्रतिनिधी/ बेळगाव
पेट्रोल-डिझेल, भाजीपाला पाठोपाठ आता डाळी आणि कडधान्यांच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. डाळींच्या किंमतीही प्रति किलो 10 ते 20 रुपयाने वाढल्या आहेत. भाजीपाल्यांबरोबर कडधान्यांच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
मागील आठ दिवसांत तुरडाळ, मूगडाळ आणि मसूर डाळींच्या किंमती वाढल्या आहेत. कडधान्याचे दर वाढल्याने गृहिणीला आता विचार करावा लागणार आहे. तूरडाळीचा दर प्रति किलो 20 रुपयांनी वाढल्याने एक किलोसाठी 120 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे हॉटेल, मेस, रेस्टॉरंट, कॅन्टीनवर मोठा परिणाम झाला आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने जीवनावश्यक गोष्टी खरेदी करताना सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तेंड द्यावे लागत आहे. गेल्या काही दिवसात तेलांच्या किंमती काही प्रमाणात कमी झाल्या असल्या तरी डाळींचे भाव वाढल्याने जनता अडचणीत सापडली आहे.
बाजारात धान्य व डाळींचा प्रति किलोचा दर ः तूरडाळ 120 रु., मूगडाळ 110 रु., मसूरडाळ 100 रु., हरभरा डाळ 75 रु., कडधान्यांमध्ये मटकी 110 रु., वाटाणा 70 रु., मसूर 100 रु., हरभरा 70 रु., छोले मटार 120 रु., चवळी 80 रु., मूग 90 रु. असा दर आहे. अतिवृष्टीमुळे पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे येत्या काळात डाळींच्या पुन्हा किंमती वाढण्याची शक्मयता आहे. आधीच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता कडधान्य आणि डाळींच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य जनता महागाईच्या कचाटय़ात सापडली आहे.