ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे जिल्ह्यातील सासवड परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका हॉटेल चालकाने निर्दयीपणे तीन भिकाऱ्यांवर उकळतं पाणी ओतलं. यात गंभीर जखमी झालेल्या दोन भिकाऱ्यांचा मृत्यू झाला असून, हॉटेलचालकाविरोधात जिल्ह्यातून संताप व्यक्त होत आहे.
पप्पू उर्फ निलेश जयवंत जगताप असे या हॉटेल चालकाचे नाव आहे. सासवड पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर त्याचे हॉटेल आहे. हॉटेलजवळच्या ओसरीवर दररोज तीन भिकारी बसत होते. याचा राग मनात धरून 23 मे रोजी जगताप याने या भिकाऱ्यांना काठीने मारहाण केली. त्यानंतर उकळतं पाणी त्यांच्या अंगावर ओतलं. यात तिन्ही भिकारी गंभीररित्या भाजले. यात दोन भिकाऱ्यांचा मृत्यू झाला. आज दहा दिवसानंतर ही घटना उजेडात आली आहे. घटनास्थळापासून सासवड पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असूनही पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.
जगताप हा तेथील स्थानिक आमदाराचा नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आमदारानेच पोलिसांवर दबाव आणल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे हॉटेलचालक मोकाट फिरत असून, त्याच्यावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.