आंदोलन अनावश्यक असल्याची टिप्पणी ः चंदीगड सीमेवर एकवटले शेतकरी
@ वृत्तसंस्था / चंदीगड
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारचे मुख्यमंत्री भगवंत मान हे शेतकऱयांवर संतप्त झाले आहेत. चंदीगड-मोहाली सीमेवरील शेतकऱयांचे आंदोलन अनावश्यक असल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे. शेतकऱयांनी नारे देण्याऐवजी पाणी वाचविण्याचा प्रयत्न करावा. मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा अर्थ मुर्दाबाद असा नसतो. कमीत कमी एक वर्षांचा कालावधी मला द्या असे भगवंत मान यांनी शेतकऱयांना उद्देशून म्हटले आहे. चंदीगड सीमेवर शेतकऱयांनी सिंघू सीमेप्रमाणे आंदोलन सुरू केले असताना भगवंत यांनी ही भूमिका मांडली आहे. शेतकऱयांनी बुधवारी चंदीगडमध्ये घुसण्याची घोषणा केली आहे.
पेरणीसाठी क्षेत्रनिहाय कार्यक्रमामुळे शेतकऱयांच्या हितांना धक्का पोहोचणार नाही. या कार्यक्रमामुळे राज्यात भूजल वाचविण्यास मदत होणार आहे. गुरुंनी दाखविलेल्या मार्गावर मी चालत असून त्यापासून मला कुणीच रोखू शकत नाही. शेतकऱयांसोबत चर्चा करण्यासाठी दरवाजे सदैव खुले आहेत. माझ्या विरोधात घोषणाबाजी पाण्याच्या पातळी आणखीन खालावण्यापासून रोखण्याच्या माझ्या दृढनिश्चयाला तोडू शकत नसल्याचे मान यांनी म्हटले आहे.
मी देखील शेतकरीपुत्र
मी स्वतः शेतकऱयाचा मुलगा असल्याने शेतकऱयांच्या गरजा कोणत्या हे मला चांगल्यप्रकारे माहिती आहे. 10 जून आणि 18 जूनमधील फरक मी चांगल्याप्रकारे जाणतो. पाणी आणि हवा वाचविण्यात माझा कुठलाच वैयक्तिक स्वार्थ नाही, तर निसर्गाच्या स्रोतांना वाचविण्यासाठी जबाबदारी आम्हा सर्वांची आहे. शेतकऱयांनी आंदोलन करण्याऐवजी पंजाब आणि पंजाबींच्या कल्याणासाठी मला साथ द्यावी असे आवाहन मान यांनी केले.
शेतकरी संघटनांना आवाहन
शेतकऱयांनी मला एक वर्षापर्यंत सहकायं करावे. यादरम्यान शेतकऱयांना कुठल्याही प्रकारचे नुकसान झाल्यास राज्य सरकार त्याची भरपाई करणार आहे. राज्याचे पाणी वाचविणे आणि प्रदूषण रोखण्यासाठी चांगला विचार करत असेन तर मी चुकीचा कसा अशी विचारणा त्यांनी शेतकरी संघटनांना उद्देशून केली आहे.
मुलांच्या मृत्यूप्रकरणी गप्प का?
बटाला येथे शेतातील कचरा जाळल्यावर त्यामुळे निघालेल्या धूरामुळे स्कुलबसची दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी शेतकरी संघटना गप्प का बसल्या असे प्रश्नार्थक विधान त्यांनी केले आहे.