केंद्र सरकारकडून उगविला जातोय सूड
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रजासत्ताक दिन संचलनात यावेळी दिल्लीचा चित्ररथ दिसून येणार नाही. केंद्र सरकारने यासंबंधीचा दिल्लीचा प्रस्ताव फेटाळला आहे. याप्रकरणी आम आदमी पक्षाने केंद्र सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. मोदी सरकार दिल्लीला सापत्नपणाची वागणूक देत असल्याचा आरोप आपकडून करण्यात आला.
भाजपशासित राज्यांना मोदी सरकार सातत्याने संधी देत आहे, तर दिल्ली सरकारला स्वत:चे मॉडेल देशासमोर ठेवण्याची संधी मिळाली नसल्याचा दावा आपने केला आहे. देशाची राजधानी दिल्लीचा चित्ररथ केंद्र सरकार तीन वर्षांपासून रद्द करत आहे. 2022 मध्ये ‘रिझॉल्व्ह 75’ अशी थीम होती, ज्यात दुसऱ्या टप्प्यातील बैठकांमध्ये आमच्या डिझाइनला नाकारण्यात आले होते. 2023 मध्ये ‘नारीशक्ती’ थीम होती आणि आमच्या डिझाइनला पुन्हा रद्द करण्यात आले. 2024 मध्ये विकसित भारत अशी थीम असून आमचा चित्ररथ यावेळीही रद्द करण्यात आला असल्याचा दावा दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.
दिल्ली सरकारचे शिक्षण आणि आरोग्याचे मॉडेल आम्ही चित्ररथाच्या माध्यमातून दाखवू इच्छित होते. आगामी प्रजासत्ताक दिन संचलनासाठी पंजाब सरकारचा चित्ररथ देखील रद्द करण्यात आला आहे. केंद्र सरकार आप सरकारकडून केवळ सूड उगवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भारद्वाज यांनी केला आहे.
चित्ररथाच्या माध्यमातून दिल्लीत महागाई सर्वात कमी आणि दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे, वीज-पाणी स्वस्त असून उ•ाणपूल अनुमानित खर्चापेक्षा कमी किमतीत उभारले जात असल्याचे आम्ही दाखवून देऊ इच्छित होतो, परंतु मोदी सरकारने याची अनुमती नाकारल्याची टीका आप प्रवक्त्या प्रियांका कक्कड यांनी केली आहे.