म. ए. समितीचा निश्चय : प्रत्येक मराठी भाषिकाला सामावून घेणार
बेळगाव : राजहंसगडावर उभारण्यात आलेल्या शिवमूर्तीचे दोनवेळा अनावरण करण्यात आले. केवळ मराठी भाषिकांची मते मिळविण्यासाठी राष्ट्रीय पक्षांकडून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला जात आहे. याविऊद्ध स्वाभिमानी मराठी भाषिक रविवार दि. 19 रोजी शिवमूर्तीचे शुद्धीकरण करणार आहेत. प्रत्येक मराठी भाषिकाला या कार्यक्रमात सामावून घेण्याचा निश्चय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शहर म. ए. समिती व तालुका म. ए. समितीची संयुक्त बैठक बुधवारी मराठा मंदिर येथे पार पडली. या बैठकीत शिवमूर्तीच्या शुद्धीकरण कार्यक्रमाविषयी कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली. शुद्धीकरणासोबतच राजहंसगडावर महाप्रसादाचे आयोजन केले जाणार आहे. प्रत्येक मराठी माणसाची छत्रपती शिवाजी महाराजांवर श्रद्धा आहे. त्यामुळे फूल ना फुलाची पाकळी म्हणून शक्य असेल ती रक्कम व साहित्य स्वीकारले जाणार आहे.
केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठी भाषिकांची मते मिळविण्यासाठी राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांकडून खटाटोप सुरू आहे. कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर दडपशाही केली जात असताना महाराष्ट्रातील नेते मात्र पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. सीमाभागातील नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील नेत्यांनी केला आहे. म. ए. समितीने पूर्वकल्पना देऊनदेखील महाराष्ट्रातील नेते व छत्रपतींचे वंशज उपस्थित राहिले. याबद्दल त्यांचा निषेध करण्यात आला. अॅड. एम. जी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. मदन बामणे यांनी मिरवणूक काढून भव्य सोहळा करण्याची सूचना मांडली. भागोजी पाटील, रामचंद्र मोदगेकर यांनी सूचना मांडल्या. प्रकाश अष्टेकर यांनी येळ्ळूर विभाग समितीच्यावतीने जितके शक्य होईल तितके सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कल्लाप्पा पाटील यांनी शिवप्रतिष्ठानतर्फे आपली भूमिका मांडली. प्रकाश मरगाळे व मनोहर किणेकर म्हणाले, प्रत्येकाने भगवे झेंडे, भगवे फेटे बांधून राजहंसगड येथे दाखल व्हावे. महाराष्ट्रातील नेत्यांनाही आपल्या चुकीची जाणीव या माध्यमातून करून द्यावी, असे त्यांनी सांगितले. माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी राजहंसगड वाचविण्यासाठी येळ्ळूरच्या नागरिकांनी काढलेल्या मोर्चाचे कौतुक केले. मनोज पावशे यांनी कार्यक्रमापूर्वी व कार्यक्रमानंतर गडाची स्वच्छता करण्याची सूचना मांडली. मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, शंकर बाबली, महादेव पाटील यांसह इतर कार्यकर्त्यांनी आपली मते व्यक्त केली.