पुणे / प्रतिनिधी :
पतीचे निधन झाल्यानंतर संबंधित महिलेसाठी विधवा हा शब्द वापरणे सर्वार्थाने चुकीचे आहे. त्याऐवजी पूर्णांगी हाच शब्द महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान करणारा आहे. यापुढे विधवा हा शब्द काढून टाकून त्याऐवजी पूर्णांगी हा शब्द कायमस्वरूपी वापरण्यात यावा, अशी शिफारस राज्य महिला आयोगाकडून सरकारकडे करण्यात येणार सल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पिंपरीत बोलताना केली.
‘दिशा सोशल फाऊंडेशन’च्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चारचौघी या नाटकातील कलावंत, लेखक, दिग्दर्शक यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रातील महिलांच्या सत्कार आयोजित करण्यात आला. या वेळी चाकणकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. चिंचवड नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, प्रसिध्द अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रशांत दळवी आदी उपस्थित होते.
चाकणकर म्हणाल्या, १७५ वर्षापूर्वी ज्योतिबांच्या सावित्रीने स्त्री शिक्षणाचा पाया रचला. दुर्दैवाने सावित्रीमाई आम्हाला कितपत समजल्या, हा प्रश्न आहे. अनेक कर्तृत्ववान स्त्रियांनी योगदान दिले, लढा दिला, परंतु महाराष्ट्र बदलला नाही. आमची वेशभूषा बदलली. घर, गाड्या, रस्ते बदलले. परंतु, आमच्यातील माणूस बदलला नाही, ही खरी शोकांतिका आहे. स्त्रियांचे प्रश्न वर्षानुवर्ष कायम आहेत. समाज कितीही पुढारलेला वाटत असला, तरी स्त्रियांचे मूळ प्रश्न कायम आहेत. आपल्या समाजात मुलींच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करताना आम्ही काटकसर करतो. मात्र हुंड्यासाठी आम्ही कर्ज काढतो. शिक्षण आणि तिचे कर्तृत्व ह्याच गोष्टींना महत्त्व दिले गेले पाहिजे. महिलांना पुरुषांमुळेच त्रास होतो असे नाही, तर महिलाच महिलांना त्रास देण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.