अंगावर खाकी वर्दी असली की, आपले कुणी वाकडे करू शकणार नाही. त्याचबरोबर राजकीय आशीर्वाद असल्याची गुर्मी या खात्यात काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून गुंडागर्दी होणे स्वाभाविक आहे. अंगावरील खाकी वर्दीची शान ज्यांना कळली, ते अशा गोष्टींपासून नेहमीच दूर राहिलेत.गुंडागर्दीला शोभावा असाच प्रकार फोंडा तालुक्यातील माशेल गावात अलीकडेच घडला आहे. ऑफ ड्युटी पोलिसांनी गुंडागर्दी करत युवकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. हे वरिष्ठांनी गांभीर्याने घेत वेळीच संबंधीतांची कानउघडणी करणे गरजेचे आहे. हे करतानाच पुढील वेळेस असे प्रकार होणार नाहीत, ही जबाबदारीची जाणीवही इतर सहकाऱ्यांना करुन देणे गरजेचे असणार आहे.
फोंडा तालुक्यातील माशेल गावात ‘ऑफ ड्युटी’ पोलिसांनी गुंडागर्दी करीत एका युवकाला मारहाण करण्याची घटना घडल्याने खाकी वर्दीतील गुंडागर्दी पुन्हा एकदा चर्चेत आली. फास्ट फूडचा व्यवसाय तेजीत चालतोय, हे एका खाकी वर्दीतील हवालदाराच्या पचनी पडले नाही. त्याने इतरांच्या मदतीने फास्ट फूडचा व्यवसाय करणाऱ्या युवकाला मारहाण केली. हे क्षुल्लक कारण. आपण पोलीस खात्यात नोकरी करतोय, हाच बहुदा त्यांना माज असावा. हा माज जर त्यांनी एखाद्या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी वापरला असता तर त्यांचे कौतुक झाले असते पण नको त्या गोष्टीसाठी हा माज दाखविला व निलंबनाची वेळ आली.
गोव्यात एकेकाळी पोलीस खात्यात सहज नोकरी मिळत होती मात्र आज ते दिवस इतिहास जमा झाले आहेत. आज पोलीस खात्यात नोकरी मिळविण्यासाठी मंत्री-आमदार यांचा वशिला लागतोच. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आर्थिक किंमत मोजावी लागते. एकप्रकारे नोकरी विकतच घ्यावी लागते. त्यामुळे पोलीस खात्यात काम करणारे कर्मचारी आपल्या पदाला किती न्याय देणार, हा सवाल उपस्थित होत आहे.
सरकारच्या विविध खात्यांपैकी पोलीस खाते हे खूपच महत्त्वाचे. या खात्याचा सातत्याने जनतेशी संपर्क येतो. त्यामुळे या खात्यात काम करणारे कर्मचारी हे प्रामाणिक असावेत, अशी सर्वांचीच अपेक्षा असते मात्र अवघेच कर्मचारी व अधिकारी सोडले तर या खात्याला ‘क्लिन चिट’ देणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे पोलिसांवर सातत्याने टीका होताना आढळून येते.
अंगावर खाकी वर्दी असली की, आपले कुणी वाकडे करू शकणार नाही. त्याचबरोबर राजकीय आशीर्वाद असल्याची गुर्मी या खात्यात काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून गुंडागर्दी होणे स्वाभाविक आहे. अंगावरील खाकी वर्दीची शान ज्यांना कळली, ते अशा गोष्टींपासून नेहमीच दूर राहिलेत.
एखाद्याला लाखो रुपये खर्च करून नोकरी विकत घ्यावी लागल्यास तो ते पैसे वसूल करण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकतो. त्याला पोलीस खात्यातील कर्मचारी तरी कसे अपवाद असतील. भल्या सकाळी रस्त्यावर उभे राहून वाहन चालकांना दंड देण्याचे प्रकार घडतात. यातील किती पैसा सरकारी तिजोरीत जातो, हा संशोधनाचा विषय आहे. त्याचबरोबर मटका, ड्रग्ज व इतर बेकायेदशीर व्यवसायातून मिळणारा हप्ता हा वेगळा. त्यामुळे अनेकांचा पोलीस खात्यातील नोकरीकडे डोळा असतो.
गोव्यात पूर्वी पोलीस खात्यात नोकरीसाठी कुणी सहसा पुढे येत नव्हते. त्यामुळे शेजारील राज्यातून आलेल्यांनी नोकरी मिळविली. कालांतराने यात बदल झाला व आज स्थानिकांचा कल पोलीस खात्यातील नोकरीकडे वाढला. पोलीस खात्यात वरिष्ठ अधिकारी सोडले तर अधीक्षक, उपअधीक्षक, निरीक्षक, उपनिरीक्षक, साहाय्यक निरीक्षक, हेड कॉन्स्टेबल ते कॉन्स्टेबल या पदांवर काम करणारे बहुसंख्य हे गोमंतकीय आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या कार्याची अपेक्षा ठेवणे स्वाभाविक आहे मात्र माशेल येथे झालेल्या प्रकारातून पोलीस खात्यात नेमके काय चालते, याचे चित्र पुढे आले.
पोलीस खात्यात काही कर्मचारी हे खूप प्रामाणिकपणे आपले काम करताना आढळून येतात. अशा कर्मचाऱ्यांकडून नव्याने भरती होणाऱ्यांना शिस्तीचे धडे देण्याची गरज आहे. त्याचबरोबर प्रशिक्षणाच्या काळातही त्यांना सामान्य लोकांशी कसे वागावे, त्यांच्या समस्या कशा सोडवाव्या, याचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. प्रशिक्षण काळात जर ते सहकार्य करीत नसतील तर त्यांना तेथूनच माघारी पाठविणे योग्य ठरेल.
पोलीस खात्यातील काही बडे अधिकारीदेखील भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप होत आहे. ते स्वत:ला ‘सिंघम’ समजतात. त्यांचीही चौकशी होणे आवश्यक आहेच. आपले वरिष्ठ अधिकारीच जर नको असलेल्या गोष्टी करू लागले तर त्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारीदेखील त्यांचाच कित्ता गिरविणार नाही कशावरून. पोलीस खात्यात एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाली की, तो आपल्यासोबत ठराविक उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल यांना नेण्यासाठी धडपडत असतो. याचाही अभ्यास होणे आवश्यक आहे.
पोलीस खात्यातील वर्दीचे महत्त्व गुंडागर्दीमुळे कमी होणार नाही तर चांगल्या कार्याने वाढणार याकडे वरिष्ठांचेदेखील लक्ष असणे आवश्यक आहे. काही कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून चांगली वागणूक मिळत नाही. त्यांचे खच्चीकरण करणे, त्यांना मानसिक त्रास देणे, असे प्रकार होतात. तेही बंद व्हायला पाहिजेत.
महेश कोनेकर