हल्याळ येथील गुरुवंदन कार्यक्रमात मंजुनाथ स्वामी यांचे प्रतिपादन
वार्ताहर /नंदगड
जगात शांततेने व समाधानाने आपण येथे किती दिवस राहणार आहोत? एक दिवस आपण या जगाचा निरोप घेऊन जायचे आहे. हे ज्याला समजले तोच खऱया अर्थाने सुखी व समाधानाने जीवन जगतो. त्यासाठी अहंकार बाजूला ठेवून सर्वांशी प्रेमाने, सलोख्याने वागले पाहिजे, असे प्रतिपादन बेंगळूर येथील गोसावी मठाचे मठाधीश व मराठा समाजाचे गुरु मंजुनाथ स्वामी यांनी हल्याळ येथे आयोजित केलेल्या गुरुवंदन कार्यक्रमात केले.
हल्याळ येथील मराठा समाजाच्यावतीने मंजुनाथ स्वामी यांच्या सत्कारानिमित्त सोमवारी गुरुवंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी के. के. हळ्ळी येथील सुब्रमण्यम स्वामी, आमदार व माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, मराठा समाजाच्या ज्ये÷ व्यक्ती उडचाप्पा बोबाटे, शंकर बेळगावकर, शांताराम जावळेकर, परशराम पवार, श्रीपती भट, सुभाष कोरवेकर, कृष्णा पाटील, वाय. पी. बोबाटे, संतोष रेणके, मंगला बसेटकर आदींसह अनेक मान्यवर व हजारो मराठा बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते.
मंजुनाथ स्वामी म्हणाले, माणसाने शिक्षणाबरोबरच शास्त्र, धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करायला हवा. माणूस शिक्षणाबरोबरच संस्काराने समृद्ध होणे गरजेचे आहे. यासाठी साधु-संतांचा सहवास महत्त्वाचा आहे. चांगले आचार-विचार जीवनात आत्मसात करून भावी जीवन जगावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
माजी मंत्री देशपांडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजालाही तितकेच महत्त्व देऊन उत्तम राज्यकारभार केला. त्यामुळे शिवाजी महाराज सर्वांचे आदर्श राजे व जगातील महान राजे आहेत. आज राष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर प्रेम व विश्वासाचे वातावरण असायला हवे. प्रत्येकाला स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी चांगल्या आरोग्याची व शिक्षणाची गरज आहे.
यावेळी के. के. हळ्ळी येथील सुब्रमण्यम स्वामी, सुभाष कोरवेकर, मंगला बसेटकर व अन्य मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. विविध संघ-संस्था व संघटनांच्यावतीने मंजुनाथ स्वामी यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सुरुवातीला मंजुनाथ स्वामींची शहरातील विविध मार्गांवरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत वारकरी, महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी भजनात तल्लीन झाले होते.