अर्जुन यादव खून प्रकरण : तपास शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग; अधिकृत माहिती हाती न आल्याने तपासावर प्रश्नचिन्ह
प्रतिनिधी सातारा
नटराज मंदिर परिसरात वाईच्या अर्जुन यादववर बेछुट गोळीबार करून त्याचा खून करण्यात आला. या खूनातील पाचही आरोपी जेरबंद करण्यात आलेले आहेत. परंतु ज्या पिस्तुलमधून गोळीबार करण्यात आला ती सापडली का नाही यावर अद्याप प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याचा तपास शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आलेला आहे. परंतु पोलीस निरीक्षक निंबाळकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन उचला नाही.
सातारा शहरात खूनाची घटना घडताच पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्ती उदयास येत असल्याचे चित्र पहायला मिळाले. हा खून टोळी युद्धातून झाल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. या खूनात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तर मुख्य सुत्रधार यांना मुंबई येथून अटक करण्यात आलेली आहे. हा खून जुन्या भांडणाचा राग मनात धरून केल्याचे पोलिसांनी सांगितले.
अवघ्या काही दिवसांच्या आत अर्जुनच्या मारेकरांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. आता पुढील तपास हा शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर अर्जुनवर ज्या पिस्तुलने गोळ्या झाडण्यात आल्या. ती पिस्तुल पोलिसांच्या हाती लागली का? याची माहिती समोर आलेली नाही. तसेच पिस्तुल मिळाली तर ती आली कोठून, पिस्तुल चालवण्याचे ट्रेनिंग कोणी दिले? बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणे हा गुन्हा आहे. असे असताना पिस्तुलची माहिती पोलीसांना का मिळाली नाही ? याबाबतच्या कारवाई किती झाल्या ? जिह्यात बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगले जात असताना कारवाई का करण्यात येत नाही ? असे अनेक प्रश्न या खूनाच्या प्रकरणामुळे समोर येत आहेत.
पोनि निंबाळकरांच्या फोनची ट्रिंग ट्रिग
अर्जुन यादव खून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने शहर पोलिसांकडे वर्ग केला आहे. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली. तोच शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना फोन केला असता काही क्षण त्यांच्या फोनची ट्रिंग ट्रिग वाजून फोन कट झाला. यामुळे पिस्तुलबाबत कोणतीही अधिकृत माहिती हाती आली नाही.