शिवसेना व शिंदेगटात सातत्याने संघर्ष निर्माण होऊन राडे होत आहेत. आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत कोणत्या ना कोणत्या कारणावरून राडे होण्याची चिन्हे दिसत आहेत. मुंबईत गणेश मूर्ती विसर्जनावेळी झालेल्या राडय़ानंतर ते स्पष्टच झाले आहे. या मुंबईतील बऱयाच नेत्यांचे मूळ हे कोकणात आहे. त्यामुळे कोकणातही राडेबाजी होऊ शकते, हे लक्षात घेऊन पोलिसांनी आतापासूनच कमालीची सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईतील बहुतांश नगरसेवक, आमदार मूळ कोकणचे आहेत. म्हणूनच गेली 25 वर्षे मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता कायम राहिली आहे. मात्र शिवसेनेमध्ये आता उभी फूट पडल्याने सत्तेला सुरुंग लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुंबईत शिवसेनेच्याच दोन गटात आपापसात संघर्ष निर्माण होऊन राडेबाजी सुरू झाली आहे. सत्तासंघर्षामुळे गटबाजीचा संघर्ष राडेबाजीचे टोक गाठत आहे. ‘मुंबईत राडेबाजी.. मात्र सावधगिरी कोकणात’ बाळगली जात आहे.
मुंबईत कुठलीही घटना घडली तरी त्याचे पडसाद नेहमी कोकणात उमटत असतात. महाविकास आघाडी सरकारला धक्का देत 20 जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि त्यानंतर आपल्या शिंदे गटाच्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले. ज्यावेळी शिंदे बाहेर पडले, त्यावेळीही कोकणातील कुठले आमदार त्यांच्यासोबत जाणार याकडे लक्ष लागले होते. पहिले दोन दिवस ठाकरेंसोबत असणारे शिवसेना आमदार दीपक केसरकर, उदय सामंत, योगेश कदम हे शिंदे गटात दाखल झाले. तर वैभव नाईक, राजन साळवी, भास्कर जाधव हे आमदार ठाकरेंसोबत कायम राहिले. कार्यकर्ते मात्र योग्य संधीची वाट पाहत राहिले. त्यामुळे कोकणातील शिवसैनिक अजूनही मोठय़ा प्रमाणात शिंदे गटात सहभागी झालेले नाहीत. अजूनही ते सावध भूमिकेत आहेत. मात्र आगामी निवडणुकांमधून शिंदे गटात कोण जातील आणि ठाकरेंच्या शिवसेनेत कोण राहतील, हे स्पष्ट होईल. मात्र सत्तासंघर्ष वाढू शकतो. मुंबईतील संघर्षाचे पडसाद कोकणात उमटू शकतात. याची चाहूल पोलिसांना लागली असल्याने खबरदारीच्या उपाययोजना त्यांनी सुरू केल्या आहेत.
शिंदेंनी आपलीच खरी शिवसेना, असा दावा केला आहे. तर खरी शिवसेना कुणाची हा वाद न्यायालयात गेला आहे. परंतु, जे कट्टर शिवसैनिक आहेत, त्यांना शिंदे गटाने शिवसेनेवर केलेला दावा रुचलेला नाही. त्यामुळे सातत्याने शिवसेना व शिंदे गटात संघर्ष निर्माण होऊन हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष वाढतच चालला आहे.
मुंबई महानगरपालिका म्हणजे शिवसेनेसाठी जीव की प्राण आहे. महानगरपालिका शिवसेनेच्या हातून गेली, तर शिवसेनेचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत गेली 25 वर्षे सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी भाजप आणि शिंदे गट आक्रमक झाला आहे. शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी भाजप व शिंदे गट सोडत नाही. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. मुंबईत दादर प्रभादेवी येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी थेट पिस्तूल काढून हवेत गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेने केला. या राडय़ाचे पडसाद आता सर्वत्र उमटत आहेत.
मुंबईतील शिंदे गट आणि शिवसेनेच्या राडय़ामध्ये आता भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एन्ट्री केली आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली व त्यानंतर त्यांनी बोलताना शिवसेनेकडे तक्रार करण्यापलीकडे फार काही उरले नाही. मातोश्रीमध्ये बसून तक्रारींचे मार्केटिंग सुरू असल्याची टीका करीत शिवसेनेला डिवचले आहे. त्यामुळे राणे आणि शिवसेनेमध्ये पुन्हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि नारायण राणेंमध्ये नेहमीच संघर्ष सुरू असतो. एकमेकांवर टीका करण्याची संधी कधीही ते सोडत नाहीत. मुंबईच्या वादात राणेंनी उडी घेतल्याने त्याचे कोकणातही पडसाद उमटू शकतात. राणे केंदीय मंत्री झाल्यानंतर त्यांनी काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेच्यावेळी कोकणात मोठा राडा झाला होता. त्यामुळे राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष यापुढेही राहणार असून निवडणूक काळात तो अधिक प्रकर्षाने दिसून येईल, अशी शक्यता आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हय़ात शिंदेगटाचा फारसा प्रभाव नाही. शिंदेगटात गेलेले आमदार दीपक केसरकर कॅबिनेट मंत्री झाले, तरीही शिंदेगटासोबत मोठय़ा प्रमाणात शिवसेना पदाधिकारी किंवा कार्यकर्ते गेलेले नाहीत. सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील ठराविक पदाधिकारीच केसरकरांसोबत गेले आहेत. कणकवलीमधील काही पदाधिकारी शिंदेगटात म्हणण्यापेक्षा उदय सामंत यांच्यासोबत गेले आहेत. सद्यस्थितीत सिंधुदुर्गात शिवसेना व शिंदेगटाकडून संयमाची भूमिका दिसत असली, तरी मुंबईतील राडय़ाचे पडसाद उमटू शकतात. आगामी निवडणुकांमध्ये हा संघर्ष तीव्र होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी मात्र कमालीची सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील राडय़ानंतर शिंदे गटाचे कोण आणि शिवसेनेतील कोण याची यादी बनवण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. आगामी काळात संघर्ष वाढल्यास पोलिसांकडून खबरदारी म्हणून दोन्ही गटांकडून प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.
रत्नागिरी जिल्हय़ात सिंधुदुर्गापेक्षा शिंदेगटात सहभागी होणारे कार्यकर्ते अधिक आहेत. उदय सामंत कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर काही नगरसेवकांनी शिंदेगटात प्रवेश केला. सामंत यांचा वैयक्तिक संपर्क दांडगा असल्याने रत्नागिरीत शिंदेगटाची ताकद वाढू शकते. मात्र शिवसेनेसोबत राहिलेले आमदार भास्कर जाधव, राजन साळवी हेही तेवढेच ताकदवान आहेत. शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे 16 सप्टेंबरला रत्नागिरी जिल्हा दौऱयावर येणार आहेत. शिवसेनेचा भव्य मेळावा घेतला जाणार असून 15 हजाराहून अधिक लोकांची उपस्थिती या मेळाव्याला दिसेल, असा दावा शिवसेना आमदार राजन साळवी यांनी केला आहे. त्यामुळे या दौऱयाच्या पार्श्वभूमीवरदेखील पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. शिंदेगट आणि शिवसेनेच्या सत्तासंघर्षात शिंदेगटाला भाजपकडूनही साथ मिळत आहे. त्यामुळे शिंदेगट अधिक आक्रमक होऊ लागला आहे.
आदित्य ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा किती यशस्वी होतो आणि या दौऱयानंतर शिंदेगट व शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया उमटतील, हे पाहणेही महत्वाचे आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हय़ातही पोलिसांनी शिंदे गट व शिवसेना गटाची यादी तयार करून सावधगिरीच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. राजापूर-गोवळ येथे झालेल्या रिफायनरी प्रकल्पविरोधी सभेत उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून ठार मारु, अशी धमकी नरेंद्र जोशी नावाच्या व्यक्तीने दिली. या वक्तव्यानंतर रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्हय़ात त्याचे पडसाद उमटले. त्या धमकीचा शिंदेगटाच्या समर्थकांनी वक्तव्य करणाऱयाचा पुतळा जाळून निषेध केला. या प्रकरणात शिवसेनेचा संबंध नसला, तरी धमकीच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातत्याने सत्तासंघर्षातून राडे सुरू झाले आहेत. त्याचे पडसाद कोकणात उमटत असतात. आगामी निवडणुकांचा काळ हा नक्कीच संघर्षाचा काळ आहे.
पोलिसांना डोळय़ात तेल घालून खडा पहारा करावा लगाणार आहे. त्यामुळेच कोकणातील पोलिसांनी मुंबईतील राडय़ानंतर आतापासूनच सावधानता बाळगण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक राजकीय घडामोडीवर पोलीस लक्ष ठेवून असून आगामी काळात काय राजकीय स्थित्यंत्तरे होतात, हे आता पाहावे लागेल.
संदीप गावडे