राधानगरी (कोल्हापूर) : गेल्या आठवड्यापासून धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळीच राधानगरी धरण ६० टक्के भरले असून, १४०० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात व अभयारण्य क्षेत्रात पावसाचा जोर वाढत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. असाच पावसाचा जोर राहिल्यास पुढील आठवड्यात धरण पूर्ण क्षमतेने भरेल असा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तवला आहे.
गेल्या वर्षी २५ जुलै रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरून धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते. संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने योग्य काळजी घेतली असून खाजगी ‘बीओटी’ च्या तत्वावर असलेल्या वीज निर्मिती केंद्रातून १४०० क्यूसेक प्रतिसेकंद विसर्ग भोगावती नदीत सुरू असल्याने नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
काल पासून शिरगाव बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी तारळे व राशिवडे या मार्गावरून सद्या वाहतूक सुरू आहे. तसेच ओढ्या नाल्याचे पाणी भोगावती नदी पात्रात मिसळत असल्याने पडळी व पिरळ पुलाला घासून पाणी वाहत असल्याचे चित्र आहे.
आज दिवसभरात १२६ मी मी इतका पाऊस नोंदण्यात आला असून, धरणाची पाणी पातळी ३२५,४८ फूट इतकी आहे. पाणीसाठा४८४२.०९ (४-४८टी एम सी) उपलब्ध आहे, एकूण पाऊस १४४० मी मी इतका नोंदण्यात आला असून १४०० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.

