राधानगरी/प्रतिनिधी(महेश तिरवडे)
राधानगरी शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी येथील अंबाबाई मंदिरात सर्वपक्षीय बैठक पार पडली. सरपंच कविता शेट्टी यांच्या आवाहनानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच राधानगरीला नगरपंचायत मानून मान्यता न मिळाल्यास येणाऱ्या आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याबरोबरच, आंदोलन व शहरबंदची हाक देण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
या बैठकीत सन २०१५ साली युतीशासनाच्या काळात तालुक्याचे मुख्यालय असलेल्या ठिकाणी नगरपंचायत निर्माण व्हावी असा अद्यादेश काढण्यात आला होता, त्या अनुषंगाने शहरातील सर्व ग्रा. प. सद्यस, विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी ज्या ठिकाणी नगरपंचायती आहेत असा शहराला भेट देऊन नगरपंचायतचे फायदे काय आहेत याची माहिती घेतली, त्यानुसार हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेल्या महिन्यात आ. प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला, त्यानुसार मुख्यमंत्री यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना तातडीने प्रस्ताव सादर करावा अशी सूचना दिली.
मात्र येत्या पंधरा दिवसांत राधानगरी ग्रा. प. चा कार्यकाळ संपत असून निवडणूक आयोगाकडून कोणत्याही परिस्थितीत प्रशासक नेमून शासनाने लवकरात लवकर राधानगरीस नगरपंचायत म्हणून मान्यता द्यावी, असा एकमताने ठराव या बैठकीत करण्यात आला.
या बैठकीत सर्व पक्ष्यांच्या सदस्यांनी राधानगरीला नगरपंचायतचा दर्जा मिळावा यासाठी शहर बंद, मतदानावर बहिष्कार, आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी सरपंच कविता शेट्टी, अभिजित तायशेटे, संभाजी आरडे, दीपक शिरगावकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.