प्रतिनिधी/ खेड
रत्नागिरी व सातारा जिल्हा जोडणाऱया रघुवीर घाटात कोसळलेली दरड सार्वजनिक बांधकाम खात्याने तब्बल 36 तासांच्या अथक प्रयत्नानंतर हटवून मार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला. 2 जेसीबीसह 4 कर्मचारी व अधिकाऱयांनी यासाठी प्रयत्न केले. दरड हटवल्यानंतर रस्त्यातच अडकलेली आकल्पे-खेड बसही मार्गस्थ झाली.
रघुवीर घाटात कोसळलेल्या दरडीमुळे कांदाटी खोऱयातील 21 गावांचा संपर्क तुटला होता. या ठिकाणी दरड कोसळल्याची माहिती मिळताच येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीसह अन्य यंत्रसामुग्री घेऊन घटनास्थळी रवाना झाले होते. शनिवारी सायंकाळी अथक प्रयत्नाने दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या हालचाली सुरू असतानाच पुन्हा त्याच ठिकाणी मोठी दरड खाली आल्याने पुन्हा हा मार्ग ठप्प झाला. यावेळी दरडीचे काही दगड उडून जेसीबी ऑपरेटरही किरकोळ जखमीही झाला होता.
रविवारी सकाळी पुन्हा येथे दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले होते. दुपारी 2 च्या सुमारास संपूर्ण दरड हटवून हा मार्ग मोकळा करून वाहतूक सुरळीत झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला. वस्तीची खेड-आकल्पे बस घेऊन गेलो होतो. दरड कोसळल्यामुळे पलिकडे अडकलो असताना शिंदी येथील सदानंद मोरे यांनी राहण्यासह सुविधांची उत्तम सोय केल्याचे एसटीचे चालक अशोक कुटे व वाहक महादेव कराड यांनी सांगितले.