काँगेस कार्यकर्त्यांनी जाळले टायर्स, सरकारचा निषेध
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नॅशनल हेरॉल्ड घोटाळा प्रकरणात काँगेस नेते राहुल गांधी यांची सलग तिसऱया दिवशीही कसून चौकशी करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी बारा वाजता ते ईडीच्या कार्यालयात पोहचले. त्यानंतर सुरु झालेली चौकशी रात्री उशीरापर्यंत केली गेली. आतापर्यंत या प्रकरणात त्यांची 30 तास चौकशी झाली आहे.
बुधवारी त्यांना प्रामुख्याने यंग इंडियन या कंपनीसंबंधी बरेच प्रश्न विचारण्यात आल्याचे समजते. या कंपनीच्या स्थापनेपासून ते आर्थिक व्यवहारांपर्यंतच्या मुद्दय़ांचा यात समावेश होता. तसेच एजेएल या कंपनीला काँगेसने दिलेले 90 कोटी रुपयांचे कर्ज, वेगवेगळय़ा कंपन्यांमधून केलेली पैशांची फिरवाफिरव, कंपन्यांची मालमत्ता, कंपन्यांचे उत्पन्न, स्वरुप आणि स्थापना यांच्यासंबंधीही प्रश्न होते.
यंग इंडियन या संस्थेत राहुल गांधी हे 38 टक्के भागधारक आहेत तर त्यांच्या आई सोनिया गांधी यांच्याकडे 38 टक्के समभाग आहेत. इतर समभाग इतर काँगेस नेत्यांकडे आहेत. सोनिया गांधींना ईडी चौकशीचे समन्स आल्यानंतर त्या कोरोनाने आजारी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या बऱया झाल्यानंतर त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते.
राहुल गांधींना मंगळवारी त्यांच्या आर्थिक व्यवहारांसंबंधी अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यांचे प्रत्येक उत्तर नोंदवून घेतले जात आहे. आतापर्यंत 80 हून अधिक पाने भरतील इतका जबाब त्यांनी दिल्याचे समजते. जबाबाच्या प्रत्येक पानावर त्यांनी स्वाक्षरी केलेली आहे. बुधवारी रात्री उशीरापर्यंत चौकशी संपलेली नव्हती. कदाचित त्यांना गुरुवारहीही चौकशीसाठी यावे लागणे शक्य आहे, अशी माहिती माहितगार सूत्रांकडून देण्यात आली.
काँगेस कार्यकर्त्यांकडून निदर्शने
राहुल गांधी यांची चौकशी आकसाने आणि सूडबुद्धीपोटी होत आहे, असा आरोप काँगेसने केला. या चौकशीच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी काँगेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. अनेक राज्यांमधील ईडीच्या कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात आली. धरणे आंदोलन आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले.
टायर्स जाळले
ईडीचा निषेध करण्यासाठी काँगेस कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर टायर्स जाळणे, घोषणाबाजी आदी प्रकार केल्याने भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संशयास्पद व्यवहारांची चौकशी करण्याचा अधिकार केंद्रीय तपास यंत्रणांना आहे. त्याप्रमाणे ते तपास करीत आहेत. त्यांना विरोध करण्याचा अधिकार काँगेसला नाही. काँगेस कांगावा करीत असल्याचा आरोप भाजपने केला.