वृत्तसंस्था /नवी दिल्ली
2024 च्या राजकीय युद्धाची तयारी आता जोर पकडू लागली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे 2024 मध्ये मोदी सरकारच्या विरोधात मोठे बळ उभे करण्याच्या योजनेवर काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तयारी अंतर्गत राहुल गांधी हे 22 ऑगस्टपासून नागरी समुदायाचे सदस्य तसेच संघटनांशी चर्चा करणार आहेत. काँग्रेस खासदार या संघटनांचे मुद्दे जाणून घेत त्यावर स्वतःचे विचार मांडणार आहेत. भारत जोडो यात्रा तसेच याच्या उद्देशावरही त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू होणार आहे. स्वतःच्या यात्रेपूर्वी राहुल गांधी यांची नागरी समुदायाच्या प्रतिनिधींशी होणारी भेट महत्त्वाची मानली जात आहे. विविध घटकांसाठी काम करणारया संघटना आणि व्यक्तींना ते भेटणार आहेत. यात योगेंद्र यादव, मेधा पाटकर यांच्यासह अनेक जणांशी तसेच संघटनांशी संपर्क साधण्यात आला आहे.
2014 पूर्वी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या बॅनर अंतर्गत अनेक संघटनांनी तत्कालीन मनमोहन सिंह सरकारच्या विरोधात वातावरणनिर्मिती केली होती. तत्कालीन विरोधी पक्ष भाजपने संपुआ सरकारचा भ्रष्टाचार तसेच धोरणलकव्याचा मुद्दा उचलून धरला होता. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला होता.
आता याच धर्तीवर राहुल गांधी सर्वसामान्य लोकांच्या गाठीभेटी घेत भाजप सरकारच्या विरोधात वातावरण तयार करू पाहत आहेत. राहुल गांधी हे स्वतःच्या भाषणांमध्ये घटनात्मक संस्थांचा कथित गैरवापर, बेरोजगारी, समाजातील दुही, शेतकऱयांचे प्रश्न आणि अर्थव्यवस्थेच्या स्थितीशी संबंधित मुद्दे उपस्थित करणार आहेत. भारत जोडो यात्रेसाठी लोगो, वेबसाइट आणि सामग्री देखील तयार करण्यात आली आहे.