काँग्रेस नेत्याच्या केदारनाथ यात्रेवरून योगी आदित्यनाथ यांची उपरोधिक टिप्पणी
भाजपचे स्टार प्रचारक आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नरसिंहपूर जिल्ह्यातील एका प्रचारसभेत काँग्रेसवर मोठा आरोप केला आहे. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1947 मध्ये सोमनाथ मंदिराच्या विकासाची योजना तयार केली होती, परंतु पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना विरोध दर्शविला होता. परंतु आता राहुल गांधी हे केदारनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेल्याचे कळल्यावर स्वत:साठी योग्य मार्ग कुठला हे राहुल यांना समजल्याने मला आनंद झाल्याची उपरोधिक टीका योगींनी केली आहे.
नरसिंहरपूर जिल्ह्यातील एका मतदारसंघातून केंद्रीयमंत्री प्रल्हाद पटेल हे भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराकरता योगींनी जाहीर सभा घेतली आहे. काँग्रेसने देशाला केवळ समस्या दिल्या आहेत. तर भाजपने सातत्याने समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. भाजपने समस्यांचा वापर करून सत्ता मिळविण्याचे षड्यंत्र कधीच केले नाही. परंतु काँग्रेस समस्यांचा वापर करत सत्ता मिळवू पाहतोय. काँग्रेसमुळेच देशाची फाळणी झाल्याचा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
काँग्रेसची सत्तेसाठीच अतिलालसा नसती तर आज जी कामे होत आहेत ती पूर्वीच पूर्ण झाली असती. परंतु काँग्रेसने कधीच देशाविषयी विचार केला नाही. उत्तरप्रदेशात डबल इंजिनचे सरकार येताच समस्या निकाली निघू लागल्या. मध्यप्रदेशात शिवराज सरकारने महाकाल लोकची भव्य निर्मिती करविली आहे. तर 500 वर्षांच्या संघर्षानंतर राम मंदिराची उभारणी सुरू आहे. 22 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी हे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत, असे उद्गार योगींनी काढले आहेत.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी काँग्रेसच्या गुंडगिरी आणि दहशतीविरोधात संघर्ष केला आहे. पटेल हे प्रेरणादायी नेते आहेत. भाजपकडे स्पष्ट व्हिजन असून आम्हाला गरीबांचे कल्याण आणि मातृशक्तिच्या स्वाभिमानाच्या रक्षणाचा संकल्प पुढे न्यायचा आहे असे योगी म्हणाले.