ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राहुल गांधींची केलेली चौकशी ही “असंवैधानिक आणि द्वेषपुर्ण” आहे. या चौकशीचा उद्देश देशातील लोकांच्या दडपशाही विरोधातल्या आवाजाला मुरड घालणे हा आहे. असे मत काँग्रेसने व्यक्त केले.
काँग्रेसचे सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यांनी असा दावा केला की केंद्र सरकार गांधी कुटुंबाच्या राजकारणाला घाबरले आहेत कारण गांधी कुटुंब हे जनतेचे प्रश्न उपस्थित करत आहेत. पुढे बोलताना, “गांधी कुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मित्रांच्या हिताचे रक्षण करण्याच्या मार्गात अडथळा बनले आहेत. त्यामुळे ही करवाई होत आहे का?” असा सवाल केला.”
“भाजपची ही कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर, असंवैधानिक, दुर्भावनापूर्ण असून राजकीय सूडबुद्धीच्या आगीत जळणाऱ्या पंतप्रधानांनी केलेला प्रयत्न आहे,” असे सुरजेवाला यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले,”राहूल गांधी सामान्य लोकांचे प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे गांधींच्या राजकारणाला सरकार घाबरले आहे” गांधी कुटुंबाच्या समर्थनार्थ काँग्रेस नेत्यांचा निषेध मोर्चा सुरूच राहील तसेच गांधींचे वंशज गोडसेच्या वंशजांना घाबरणार नाहीत अशीही टिप्पणी सुरजेवाला यांनी केली.