पंतप्रधान नरेंद्र मोदींना अस्मान दाखवणारा अजून जन्माला यायचा आहे असेच एकंदर वातावरण भासवले जात असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने पुढील आठवडय़ात देशव्यापी पदयात्रा सुरु करून राजकारण ढवळण्याचा बेत आखला आहे. त्यात तो कितपत यशस्वी होणार ते सर्वस्वी राहुल गांधींवर अवलंबून आहे. काँग्रेस हा राहुलच्या आधारावर उभा असलेला एकखांबी तंबू आहे हे खरे. पण ज्या पद्धतीने राहुल यांच्याविरुद्ध सत्ताधारी आक्रमक झाले आहेत त्यावरून ही पदयात्रा म्हणजे साधीसुधी बात नसून आपल्याला एक आव्हानच आहे असेच त्यांनी अप्रत्यक्षपणे कबुल केले आहे तेदखील खरे.
लोकसभा निवडणूक 20 महिन्यांवर ठेपली असताना विरोधी पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे याची एक पावती म्हणजेच ‘भारत जोडो यात्रा’ होय.
ही पदयात्रा लोकांना जेव्हढी भावेल तेवढा सत्ताधाऱयांच्या पोटात गोळा उठणार हे साहजिक आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या पासंगाला पुरणारा एकही पक्ष अथवा नेता नाही असा प्रचार गेली आठ वर्षात शिगेला पोचलेला असताना ही यात्रा सुरु होत आहे. 150 दिवस चालणारी ही केरळ ते काश्मीर यात्रा भल्याभल्याना हादरवून सोडेल अशी अपेक्षा काँग्रेसमधील नि÷ावंतांना आहे. काँग्रेस अस्तित्वाची लढाई लढत असताना थोडे हातपाय मारत आहे असा अर्थ देखील काहीजण काढत आहेत.
काँग्रेसच्या दरबारी राजकारणात रुळलेल्या गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या बिनबुडाच्या नेत्यांद्वारे राहुलवर जे प्रहार सुरु आहेत तो देखील सत्ताधाऱयांच्या रणनीतीचाच भाग होय असे राजधानीच्या राजकीय वर्तुळात मानले जात आहे. अर्ध शतक काँग्रेसचे मीठ खाऊन केवळ राहुलनी राज्यसभा नाकारली म्हणून पक्ष सोडून देऊन काँग्रेस नेतृत्वावर शरसंधान करणाऱया आझाद यांचे पाणी पक्षकार्यकर्त्यानी जोखले आहे. महाराष्ट्रातील दोन माजी मुख्यमंत्री अणि बरेच माजी मंत्री भाजपच्या वाटेवर आहेत आणि मुहूर्ताची वाट बघत आहेत असे बोलले जाते. त्यातील सत्यासत्यता लवकरच कळणार आहे. जसजशी यात्रा पुढे जाऊ लागेल तसतसा तिला कसकसा अपशकुन करायचा याचे जणू वेळापत्रकच तयार आहे असे समजले जात आहे.
‘काँग्रेसने पहिल्यांदा आपले घर जोडावे, ठिकठाक करावे अणि नंतर भारत जोडण्याच्या नादी लागावे’, असा शालजोडीतील भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिला आहे त्याला या संदर्भात जरूर एक अर्थ आहे. काँग्रेसमध्ये कोणाचा कोणाला पायपोस नाही अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे सारेजण आपले भले कोठे होईल तिकडे जात आहेत/जाऊ बघत आहेत. राहुल यांची याबाबत ‘सही दिशा, स्पष्ट नीती’ आहे. ‘ज्यांना जायचे आहे त्यांनी जरूर जावे. उगीच खोळंबून राहू नये.’, असाच त्यांचा संदेश आहे. अशी मंडळी एकदाची गेली की पक्षाची अडगळ जाईल, असे राहुल यांचे प्रांजळ मत आहे. अशातच काँग्रेसमधील संघटनात्मक निवडणूक कार्यक्रम सुरु झाला आहे. राहुल पक्षाध्यक्ष झाले अथवा नाही तरी प्रत्यक्षात तेच नेते राहणार यात शंका नाही.
सध्याच्या युगात प्रसारमाध्यमांच्या झगमगाटात प्रत्येक नेता आपले प्रभामंडल मोठे करण्याचा प्रयत्न करत असताना काँग्रेसचे रणनीतीकार देखील राहुलना ‘जाणता नेता, जनतेचा नेता’ अशा प्रकारे प्रोजेक्ट करत आहेत. 2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यापासून राहुल नि विविध ठिकाणी 65पेक्षा जास्त वेळा पत्रकार परिषद घेऊन लोकांचे मुद्दे मांडलेले आहेत. अशावेळी स्वतःला थोर नेते म्हणवणारे काहीजण गेल्या आठ वर्षात एकदादेखील पत्रकारांना सामोरे गेलेले नाहीत अशी मखलाशी देखील केली जात आहे. गेल्या आठ-दहा वर्षात राजकारण पार बदललेले आहे. ओळखू येणार नाही एव्हढे बदलले आहे. मोदींचे नाणे राष्ट्रीय राजकारणात चलनी झाल्यापासून बऱयावाईट बऱयाच गोष्टी घडलेल्या आहेत. त्यातून राष्ट्रहित किती पुढे गेले अथवा नाही हा ज्याच्या त्याच्या मताचा भाग असू शकतो. पण सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विसंवादाची निर्माण झालेली दरी लोकशाहीकरता फार घातक आहे असे समजले जात आहे ते फारसे चुकीचे नाही. प्रादेशिक पक्षांचा जीवच छोटा असल्याने त्याना मर्यादा पडतात. अशावेळी भले भले प्रादेशिक नेते ‘जरा हटके, जरा बचके’ चालतात. काहीजण तर अक्षरशः शरण जातात अणि मांडलिक होतात.
अशाकाळात राहुल यांचे अग्निदिव्य सुरु झाले नसते तरच नवल होते. गेल्या दोन लोकसभा निवडणूकात काँग्रेसचे पानिपत झाल्याने ‘काँग्रेस मुक्त भारताच्या घोषणा होत आहेत. असे असले तरी गेली दशकभर ‘पप्पू’ म्हणून विरोधकांनी सातत्याने हिणवून देखील राहुल हेच सत्ताधाऱयांचे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून उदयाला आले आहेत ही बाब निर्विवाद.
राष्ट्रीय राजकारणात राहुल हे एकमेव नेते आहेत की ज्यांनी कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता सर्व ज्वलंत प्रश्नांवर मोदी सरकार असो अथवा भाजपवर आगपाखड करण्याचे काम केलेले आहे, प्रश्न विचारले आहेत. संसदेत आणि संसदेबाहेर आवाज उठवला आहे. प्रश्न भयंकर महागाईचा असो अथवा बेकारीचा, अग्निवीराचा असो अथवा शेतकऱयांचा.
त्यांचे नेत्तृत्त्व कधी निखरणार याबाबत उलटसुलट मतप्रवाह आहेत. पन्नाशी उलटून गेली तरी त्यांच्या हाताला यश लागायचे आहे. सोनिया गांधींना आपल्या मुलाचा लळा नसता तर राहुल हे राजकारणात एवढे पुढे येऊच शकले नसते ही धारणा फारशी चुकीची नाही. जन्मभर विदेशी मूळ मुद्याने त्रस्त केल्या गेलेल्या सोनियाना आपल्या मुलाला पंतप्रधानपदाचा टिळा लागलेला एकदाचा बघायचा आहे. इंदिरा गांधींची सून असलेल्या आणि राजीव गांधींची पत्नी असलेल्या महिलेने आपल्या मुलाला पंतप्रधान झालेले बघायचे स्वप्न बाळगले आहे. ते कितपत बरोबर अथवा चूक ते इतिहास ठरवेल.
सध्या मात्र राहुल हे सत्ताधाऱयांचे ‘टार्गेट नंबर एक’ आहेत. ज्या पद्धतीने राहुल यांना सर्व पद्धतीने घेरणे सुरु झाले आहे त्याचा अर्थ त्याच्याकडूनच आपल्याला धोका संभवतो हे सत्ताधाऱयांनी जाणले आहे. एका राजकीय निरीक्षकाने म्हणले आहे. ‘सध्या राहुल हा केवळ अडाणी आणि बावळट एव्हढेच भासवणे पुरेसे नाही असे समजून आता तो अवैध आर्थिक व्यवहारात गुंतलेला आहे असेदेखील सांगणे सुरु झाले आहे.’ या सर्व आरोपात तथ्य कितपत ते येणारा काळ दाखवेलच.
काँग्रेस म्हणजे पाप्याचे पीतर झालेले आहे. आता यापेक्षा पक्षाची स्थिती अजून खराब होऊच शकत नाही या विश्वासाने राहुल यांची मार्गक्रमणा सुरु आहे. धाडसाने उभा ठाकलेला एक माणूसदेखील कधीकधी इतिहास घडवतो. ‘अच्छे दिन’ येणार आणि सर्वांचे भले होणार या आशेवर गेली आठ वर्षे असलेला प्रत्येकजण किती सुखावलेला अथवा दुखावलेला आहे त्यावर 2024 कसे वळण घेणार हे अवलंबून आहे. एखादा आठवडादेखील कधीकधी राजकारणाला पार कलाटणी देतो असे मानले जाते. निदान या आशेवर विरोधक कामाला लागले आहेत. ‘थांबला तो संपला. धाव त्याला दृष्टी देई, आणि रस्ता सापडे’ असे कवीने म्हटलेले आहे. काँग्रेसला रस्ता सापडणार काय? घोडामैदान जवळच आहे.
सुनील गाताडे