मध्यप्रदेशात पोहोचली भारत जोडो यात्रा
वृत्तसंस्था / उज्जैन
महाकालाची नगरी उज्जैनमध्ये सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार तसेच भाजपवर निशाणा साधला आहे. राहुल यांनी सभेत ‘जय महाकाल’ असे म्हणत स्वतःच्या भाषणास सुरुवात केली. भारत हा तपस्वींचा देश आहे. हिंदू धर्मात तपस्वींची पूजा केली जाते असे उद्गार राहुल यांनी काढले आहेत. तत्पूर्वी राहुल यांनी मंदिरात जात महाकालाचे दर्शन घेतले आहे.
गरीब, मजूर, शेतकरी, तरुण-तरुणी आणि छोटे दुकानदार हेच खरे तपस्वी आहेत. मोदी सरकार या तपस्वींसाठी काहीच करत नाही. परंतु एक-दोन जण मोदींची पूजा करतात, त्यांना सर्वकाही मिळून जात असल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.
भाजपचे नेते देवासमोर हात जोडतात आणि या देशात तपस्या करणाऱयांना संपवून टाकतात. या कृतीद्वारे देवाचा अपमान करत आहेत. शेतकरी, मजूर, छोटय़ा दुकानदारात देव आहे. देशाच्या या खऱया तपस्वींचा अपमान होत असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री 8 वाजता नोटाबंदी तर रात्री 12 वाजता जीएसटी लागू केला होता. हे दोन्ही निर्णय धोरणात्मक नव्हे तर रोख रकमेचा प्रवाह संपविण्याची शस्त्रं होती. या निर्णयामुळे देशाचे नुकसान होत असून तरुण-तरुणींना रोजगार मिळत नसल्याची स्थिती असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.