विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांचे मत
पणजी : काँग्रेसने नेहमीच दहशतवादाच्या विरोधात लढा दिला असून या दहशतवादाच्या सर्वाधिक वेदना राहुल गांधी यांनी सहन केल्या आहेत, असे मत विरोधी पक्षनेता युरी आलेमाव यांनी व्यक्त केले आहे. राहुल यांचे वडील तथा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या दहशतवाद्यांनी केली होती. त्याशिवाय त्यांच्या आजी तथा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याही हत्याच करण्यात आल्या होत्या. यावरून दहशतवादाच्या वेदना काय असतात हे त्यांच्यापेक्षा अन्य कुणीही अधिक स्पष्टतेने सांगू शकणार नाही, असे आलेमाव यांनी पुढे म्हटले आहे. ज्यांनी दहशतवाद झेलला आहे तेच त्याच्या वेदना समजू शकतात. राहुल गांधी यांच्या केंब्रिज विद्यापीठातील भाषणानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राहुल यांच्या भूमिकेवर प्रश्न विचारत केलेल्या ट्विटच्या मालिकेला उत्तर म्हणून आलेमाव यांनी दोन ट्विट केले आहेत. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येनंतरचे अनुभव कथन करणाऱ्या राहुल यांच्या श्रीनगर येथील भाषणाची व्हिडिओची लिंकही त्यांनी शेअर केली आहे. ऐतिहासिक भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या दिवशी श्रीनगर-काश्मीरमध्ये श्री. गांधी यांनी केलेले भाषण मुख्यमंत्री सावंत यांनी आवर्जून पहावे, अशी विनंती आलेमाव यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आधी सत्य समजून घ्यावे व नंतरच त्यावर प्रतिक्रिया व्यक्त कराव्या, असा सल्ला आलेमांव यांनी दिला आहे.