राहुल गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले संबोधित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. ईडीकडून होत असलेली चौकशी आणि केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. पंतप्रधानांना अग्निपथ योजना मागे घ्यावी लागेल. ईडीसारख्या यंत्रणांचा प्रभाव माझ्यावर पडत नाही. माझी चौकशी करणाऱया अधिकाऱयांना काँग्रेसच्या नेत्यांना घाबरविले-धमकाविले जाऊ शकत नसल्याचे समजले असावे, असे विधान राहुल यांनी केले आहे.
कृषी कायदे मागे घेतले जातील असे मी अगोदरच सांगितले होते. आता पंतप्रधान मोदींना अग्निपथ योजना मागे घ्यावी लागेल असे काँग्रेस म्हणत आहे. भाजप ‘वन रँक, वन पेन्शन’बद्दल बोलत होता, परंतु आता ‘नो रँक, नो पेन्शन’ आहे. तरुण-तरुणी अथक मेहनत करतील आणि घरी परततील, निवृत्त झाल्यावर त्यांना कुठलाच रोजगार मिळणार नसल्याचा दावा राहुल यांनी केला.
भाजप सरकार देशाच्या सैन्याला कमकुवत करत आहे, तरीही स्वतःला राष्ट्रवादी म्हणवून घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अग्निपथ योजना मागे घ्यावी लागेल. देशाला मजबूत करण्यासाठी खरी देशभक्ती गरजेची असल्याचे तरुणाईला ज्ञात आहे. ही योजना मागे घेतले जातील हे आम्ही सुनिश्चित करू असे उद्गार राहुल यांनी काढले आहेत.
चौकशी होत असताना कक्षात मी एकटा होतो, परंतु माझ्यासोबत आणखी अनेक लोक उभे असल्याची जाणीव होती. तपास यंत्रणा एकटय़ा माणसाला त्रास देऊ शकतात. परंतु हजारो लोक असल्यास यंत्रणांनाही हात टेकावे लागतात असे विधान त्यांनी केले आहे.