पक्षात गोंधळाची स्थिती कायम ः प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
निवडणुकीच्या टप्प्यातही काँग्रेसचा पुढचा प्रमुख कोण असेल याबाबत सध्या कोणतेही स्पष्ट संकेत नसल्याने पक्षात गोंधळाची स्थिती आहे. गेल्या म्हणजेच 2019 मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा राहुल गांधींनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारावीत, असे मत सोनिया गांधींसह अन्य नेत्यांनी व्यक्त केले आहे. तथापि, पक्षनेतृत्त्वाला राहुल गांधींच्या ‘हो’ची अद्यापही प्रतीक्षा आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा स्विकारण्यासाठी राहुल गांधी यांना प्रोत्साहित केले जात होते. मात्र, नेत्यांच्या प्रयत्नांना यश आला नसल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने पक्षातील विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. पक्षनेत्यांचा आग्रह फेटाळून लावल्याचा दावा केला जात आहे. राहुल यांच्याप्रमाणेच सोनिया गांधी यांनीही प्रकृतीचे कारण देत पक्षाध्यक्षपदाची खुर्ची पुन्हा स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पक्षाची धुरा कोणावर सोपवायची यासंबंधी तिढा निर्माण झाला आहे. अध्यक्ष निवडीसंबंधीचा अंतिम निर्णय हायकमांडच घेणार असल्याने सोनिया गांधींच्या या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रियंका गांधी-वाड्रा यांच्या नावाची चर्चाही होत असली तरी अलीकडेच उत्तर प्रदेश निवडणुकीत त्यांना चमक दाखवता न आल्याने त्यांच्याविषयी नेते-कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असलेली दिसते.
एकमत नसल्यामुळे पक्षनेते संभ्रमात
पक्षात एकमत नसताना रविवारपासून (21 ऑगस्ट) सुरू होणाऱया काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळापत्रकावर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या गोंधळावर पक्षाने अद्याप अधिकृतपणे भाष्य केलेले नाही. तरीही काँग्रेसचे दिग्गज नेते भक्त चरणदास यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांना अध्यक्षपदामध्ये स्वारस्य नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही त्यांना पदभार स्वीकारण्याची विनंती करत आहोत, असेही ते पुढे म्हणाले.
काँग्रेस पक्ष गेल्या काही वर्षांपासून नेतृत्वाच्या संकटाचा सामना करत आहे. तसेच वारंवार पराभवाचा सामना करावा लागत असल्यामुळे काही बडे नेते पक्षातून बाहेर पडल्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे.