ईशान्येतून कच्छपर्यंत असू शकते यात्रा ः रोडमॅप तयार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतच्या भारत जोडो यात्रेदरम्यान आता पुढील यात्रेचा रोडमॅपही तयार झाला आहे. पुढील वर्षी राहुल गांधी हे पूर्व भारतापासून पश्चिम भारताच्या दिशेने यात्रा काढणार आहेत. भारत जोडो यात्रेचा हा दुसरा टप्पा असेल आणि याचा पॅटर्नही पहिल्या टप्प्यातील यात्रेप्रमाणे असणार आहे. राहुल गांधींची दुसऱया टप्प्यातील भारत जोडो यात्रा ईशान्येपासून गुजरातच्या कच्छपर्यंत असू शकते. याचा मार्ग अद्याप निश्चित झालेला नाही. राहुल यांची टीम दुसऱया टप्प्यातील भारत जोडो यात्रेचे स्वरुप निश्चित करत आहे.
यात्रेत व्यापण्यापासून काही राज्ये शिल्लक राहणार आहत. सध्या ही यात्रा बॉटम टू अप म्हणजेच दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत जात आहे. पुढील यात्रा पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत असणार आहे. दुसऱया यात्रेचे नियोजन पूर्ण झाले आहे. दोन्ही यात्रांदरम्यान अधिकाधिक क्षेत्र व्यापले जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. सध्या एक रोडमॅप तयार झाला असला तरी दुसऱया यात्रेचा मार्ग निश्चित झालेला नाही. दुसरी यात्रा लोकसभा निवडणुकीपूर्वी होणार आहे. पहिल्या भारत जोडो यात्रेचा जवळपास निम्मा प्रवास सध्या पूर्ण झाला असल्याची माहिती प्रियंका वड्रा यांचे राजकीय सल्लागार विभाकर शास्त्री यांनी दिली आहे.
पहिली यात्रा 3700 किमीची
राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतच्या पदयात्रेत 3700 किलोमीटरचे अंतर कापणार आहेत. ही यात्रा 12 राज्यांमधून जाणार आहे. तर पूर्व ते पश्चिमची दुसऱया भारत जोडो यात्रेचे अंतरही 3500 किलोमीटरच्या आसपास असणार आहे.
कच्छपर्यंत असणार यात्रा
राहुल गांधींच्या दुसऱया भारत जोडो यात्रेचा प्राथमिक रोडमॅप तयार करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या रोडमॅपनुसार दुसऱया भारत जोडो यात्रेचा मार्ग ईशान्येपासून गुजरातच्या कच्छपर्यंत करण्याचा विचार केला जात आहे. ईशान्येत यात्रेचा प्रारंभबिंदू अरुणाचल प्रदेश किंवा मणिपूरमध्ये असू शकतो. दुसऱया यात्रेत मणिपूर, नागालँड, मेघालय, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात राज्य व्यापण्याचा विचार सुरू आहे. सद्यकाळात वेगवेगळय़ा मार्गांसंबंधी नियोजन सुरू आहे. दुसऱया टप्प्यातील यात्रेत अधिकाधिक राज्ये व्यापण्याच्या धोरणानुसार मार्ग निश्चित करण्यात येत आहे.
गुजरात निवडणुकीसाठी बेक
राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा मध्यप्रदेशात पोहोचल्यावर ते काही काळासाठी गुजरात निवडणुकीसाठी प्रचार करणार आहेत. गुजरातमध्ये प्रचारासाठी जाण्याकरता राहुल गांधी यात्रेत ब्रेक घेणार आहेत. नोव्हेंबरच्या अखेरीस राहुल गांधी हे गुजरातमध्ये प्रचारसभांना संबोधित करतील. देशात सर्वाधिक प्रवास करणारा नेता म्हणून विक्रम नोंदविण्याची तयारी राहुल गांधी करत आहेत. राहुल गांधी यांच्यापूर्वी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी पूर्ण देशाची यात्रा केली होती.