अभिनेता परेश रावल यांची टीका ः केजरीवालांनाही केले लक्ष्य
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या सुरू आहे, याचमुळे ते गुजरातच्या निवडणुकीत फारसा प्रचार करू शकलेले नाहीत. गुजरातमध्ये त्यांनी मोजक्याच प्रचारसभा घेतल्या आहेत. भाजपचे माजी खासदार अन् अभिनेता परेश रावल यांनी यासंबंधी राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे. आमचा एक बंधू भारत जोडो यात्रा करण्यासाठी निघाला आहे. तो यात्रेत चालू शकतो, परंतु राजकारणात चालणार नाही. 25 हजार रुपयांचे बूट यात्रेत चालण्यासाठी लागतात, परंतु राजकारणात टिकण्यासाठी साफ मन अन् तल्लख बुद्धी असावी लागते असे म्हणत रावल यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले आहे.
भारत जोडो यात्रा पाहून मला कुठलातरी व्यक्ती विनाकारण 2500 किलोमीटर चालण्यास बाहेर पडल्याचे अनेकदा वाटते असेही रावल यांनी म्हटले आहे. परेश रावल यांनी वलसाड येथे भाजप उमेदवार भरतभाई पटेल यांच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेतली आहे.
काँग्रेससोबत आणखी एक बंधू गुजरातमध्ये आला आहे. तो मोफत-मोफत सांगत फिरतो, परंतु मोफत गोष्टी देण्यासाठी तो चुकीच्या ठिकाणी आला आहे. येथील लोक गुजराती आहेत, ही अत्यंत मेहनती प्रजा आहे, दगड फोडून पाणी पिणारे येथील लोक आहेत. आम आदमी पक्षाचा नेता स्वतःच्या मुलांची शपथ घेत राजकारणात येणार नसल्याचे सांगायचा. शासकीय निवासस्थान घेणार नाही, शासकीय वाहन वापरणार नाही असे म्हणणाऱया केजरीवालांनी हे सर्वकाही मिळविल्याची टीका रावल यांनी केली आहे. परेश रावल यांनी गुंदलाव येथील सभेत भाजप उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले आहे.