माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीने व्यक्त केलेले मत
वृत्तसंस्था/ मुंबई
के. एल. राहुलने जूनमध्ये ओव्हल येथे होणाऱया जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून त्याचे स्थान निश्चित करावे, असे मत भारताचा माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीने व्यक्त केले आहे. राहुलच्या उपस्थितीमुळे संघाची फलंदाजी मजबूत होईल, असेही त्याने म्हटले आहे.
के. एल. राहुलची इंग्लंडमधील कामगिरी चांगली राहिलेली आहे. पण खराब फॉर्ममुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांनंतर वगळण्यात आले. मात्र कर्नाटकच्या या 30 वर्षीय खेळाडूने शुक्रवारी मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 75 धावांची खेळी करत शानदार पुनरागमन केले. के. एस. भरतला रिषभ पंतची उणीव भरून काढता आलेली नसल्याने सदर अंतिम सामन्यात राहुल यष्टिरक्षक म्हणून खेळू शकतो, असे शास्त्रीने म्हटले आहे.
राहुलने निवड समितीची रूची कायम ठेवण्याइतकी खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. सध्या दोन गोष्टी आहेत. त्यापैकी एक म्हणजे, रोहित शर्मा एकदिवसीय मालिकेसाठी परतल्यानंतर निर्माण होणारी परिस्थिती आणि दुसरी जागतिक कसोटी स्पधेंची अंतिम लढत. जर राहुल यष्टीरक्षण करू शकला, तर भारत आपली फलंदाजी मजबूत करू शकेल, याकडे रवी शास्त्रीने लक्ष वेधले आहे. राहुल मधल्या फळीमध्ये पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर.फलंदाजी करू शकतो. इंग्लंडमध्ये बरेच फलंदाज हाताशी ठेवावे लागतात. फिरकीपटूंना जास्त ठेवण्याची गरज नाही. राहुलकडे ‘आयपीएल’पूर्वी दोन एकदिवसीय सामने आहेत. तो भारतीय संघातील आपले स्थान निश्चित करू शकतो, असे त्याने म्हटले आहे.