पीएफआय, एसडीपीआयचे 80 हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी/ बेंगळूर
एनआयएकडून छापे पडून 5 दिवस उलटल्यानंतर पुन्हा एकदा धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी पहाटे राज्यातील 40 हून अधिक ठिकाणी धाडी टाकण्यात आले असून 80 हून अधिक पीएफआय, एसडीपीआय संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. बेळगाव, मंगळूर, शिमोगा, विजापूर, बागलकोट, धारवाड-हुबळी, रामनगर, यादगीर, कोलार, हासन, चामराजनगर, बेंगळूर ग्रामीण या जिल्हय़ांमध्ये एनआयए आणि स्थानिक पोलिसांनी धाडी टाकल्या आहेत.
कायदा-सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार यांच्या देखरेखीखाली संबंधित जिल्हा पोलीस प्रमुख आणि पोलीस आयुक्तांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. यादगीर आणि हासन जिल्हय़ांमध्ये एसडीपीआय या संघटनेच्या जिल्हा अध्यक्षांना ताब्यात घेण्यात आले आहे. मंगळूर जिल्हय़ात 25 हून अधिक पीएफआय संघटनेच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आली आहे.
रामनगर जिल्हय़ात 15, हुबळीत 10, कोलार 7, विजापूर 2, बागलकोट, बिदर 5, बळ्ळारी 5, कलबुर्गी 10, बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ातून 8 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. 22 सप्टेंबर रोजी एनआयएने देशभरात पीएफआय संघटनेच्या म्होरक्यांवर छापे टाकले होते. या कारवाईविरोधात रस्त्यावर उतरून हिंसाचार माजविण्यात आला होता. आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्यांना मंगळवारी लक्ष्य बनविण्यात आल्याचे समजते. कायदा-सुव्यवस्था आणि धार्मिक सलोख्याला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एडीजीपी अलोककुमार यांनी दिली आहे.
विजापूर येथून पीएफआय नेते जबीउल्ला, कोलार येथे पीएफआयचे जिल्हा अध्यक्ष इम्तियाज अहमद, तसेच सिद्दीक पाशा, वासीम पाशा, अल्लबक्ष, नयाज पाशा, नूर पाशा, शहबाज पाशा या 7 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हासनमध्ये एसडीपीआयचे राज्य संघटना सचिव अप्सर कोडलीपेठला ताब्यात घेण्यात आले. त्याचप्रमाणे हासन एसडीपीआय जिल्हाध्यक्ष सिद्दीक आनेमहल, मुख्य सचिव सय्यद फरीद यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
कोट्स….
खबरदारी उपाययोजना म्हणून कारवाई
खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी पीएफआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. एनआयएच्या छाप्यावेळी काही जणांनी आंदोलन करत तणाव निर्माण केला होता. त्यामुळे राज्य पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शांततेचा भंग होऊ नये या उद्देशाने अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
– अरग ज्ञानेंद्र, गृहमंत्री