मुंबई, बेंगळूर, पुणे, दिल्ली, तिरुपती शहरांकडे प्रवास : स्पेशल रेल्वे सुरू करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
ईयर एन्डिंग व विकेंड जोडून आल्यामुळे अनेकांनी बाहेर जाण्याचा प्लॅन केला आहे. परंतु रेल्वेचे बुकिंग फुल्ल असल्यामुळे चढ्यादराने
ट्रॅव्हल्सची तिकिटे खरेदी करावी लागत आहेत. मुंबई, बेंगळूर, पुणे, दिल्ली, तिरुपती या मार्गांवर धावणाऱ्या रेल्वेंचे बुकिंग वेटींगवर आहे. त्यामुळे नैर्त्रुत्य रेल्वेने महत्त्वाच्या मार्गांवर स्पेशल रेल्वे सुरू कराव्यात, अशी मागणी आहे.
नाताळापासून नववर्षाच्या स्वागतापर्यंत बऱ्याचशा कॉन्व्हेंट शाळांना सुट्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु रेल्वेचे बुकिंग मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. रेल्वेचा प्रवास हा सुखकर व किफायतशीर असल्यामुळे नागरिकांची पहिली पसंती रेल्वेला असते. परंतु यापूर्वीच बुकिंग फुल्ल झाल्यामुळे नववर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी नागरिकांना अधिकचा खर्च करावा लागत आहे.
मुंबई व बेंगळूर या दोन्ही शहरांना दररोज रात्री दोन एक्स्प्रेस धावतात. परंतु दोन्ही एक्स्प्रेसचे बुकिंग वेटींगवर आहे. तसेच नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत अनेक शाळा व कुटुंबासमवेत सहली आयोजित केल्या जात असल्याने बुकिंग फुल्ल झाले आहे. याचसोबत दिल्ली, तिरुपती, पुणे या मार्गावरही नेहमीच बुकिंग फुल्ल दाखविले जात आहे. त्यामुळे अशा गर्दीच्या मार्गांवर स्पेशल रेल्वे सुरू करण्याची मागणी होत आहे.
ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी
रेल्वेचे बुकिंग फुल्ल असल्याने याचा फायदा खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून घेतला जात आहे. बेळगाव-मुंबई या मार्गावर 800 ते 1000 रुपये असणारे तिकीट आता 1200 ते 1800 पर्यंत पोहोचले आहे. तर बेळगाव-बेंगळूर मार्गावरही हीच परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे काही ट्रॅव्हल्स चालकांकडून नागरिकांची लूट सुरू आहे. यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत असून, अशांवर आरटीओ विभागाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.