विशेष प्रतिनिधी, सुधाकर काशीद
Kolhapur News : रेल्वेशी परवलीचा असलेला गार्ड हा शब्द आणि गार्ड हे पद आता इतिहास जमा झाले आहे.आता गार्डला मेल एक्सप्रेस मेल मॅनेजर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.गार्ड म्हणजे फक्त रेल्वेला हिरवा लाल झेंडा किंवा कंदील दाखवणारा कर्मचारी ही झाली वरची ओळख.पण प्रत्यक्षात रेल्वे सुरू होण्याची शिट्टी वाजल्यापासून ते रेल्वे थांबेपर्यंत ज्यांचे काम थांबत नाही तो म्हणजे गार्ड.महत्वाचे म्हणजे आणीबाणीच्या क्षणी रेल्वे थांबवण्यासाठी या गार्डच्या हातातही ब्रेकची एक किल्ली दिलेली असते.आता मेन मॅनेजर या नव्या जबाबदारीमुळे त्यांची कधीही जगासमोर न येणारे जबाबदारीचे काम आणखी अधोरेखित झाले आहे.
हातात दीपावली सुट्टीमुळे घराकडे जाणाऱ्यांच्या गर्दीने रेल्वे खचाखच भरली आहे.त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना रजा मिळणे ही अशक्य झाले आहे.पण आपल्यामुळे इतर लोक आपापल्या घरी दीपावलीचा आनंद घेण्यासाठी जातात या वेगळ्या समाधानात रेल्वे कर्मचारी आहेत.या काळात सर्वांची जबाबदारी अर्थात प्रत्येक एक्सप्रेस मेन मॅनेजरची जबाबदारी आणखी वाढली आहे.रेल्वेचा ड्रायव्हर आणि रेल्वेचा गार्ड याबद्दल लहानांपासून मोठ्यांनाही आजही कुतहुल आहे.ड्रायव्हर रेल्वे कसा चालवत असेल? याबरोबरच रेल्वेच्या शेवटच्या डब्यात बसुन अखंड प्रवास एकट्याने करणाऱ्या गार्डला काय काय करावे लागत असेल हे बहुतेकांना माहीत नसते.त्याचे काम झेंडा दाखवणे एवढीच आपल्याला ओळख असते.
पण रेल्वे सुरू होण्यापासूनच गाडीचे काम सुरू होते.कोणत्या गाडीचा गार्ड म्हणून त्याला जावे लागणार आहे त्याची प्रत्येक डब्याच्या तपशीला सह गार्डला एका लेखी यादी द्वारे अगोदर माहिती दिली जाते.मग त्याने मद्यपान केले आहे किंवा काय याची स्टेशन मास्तर समोर तपासणी केली जाते.थंब इम्प्रेशन घेतले जाते.रेल्वेच्या डब्यात गार्ड पोहचताच त्याच्या साहित्याची लोखंडी मोठी पेटी त्या डब्यापर्यंत एक छोटय़ा गाडीवरून पोहोचवली जाते त्या पेटीत हिरवे लाल झेंडे, रजिस्टर ,हिरवे लाल दिवे, बॅटरी व इतर महत्त्वाचे साहित्य असते.ही पेटी गार्ड कडे पोहोचली की,गाडीचे सर्व ब्रेक चांगल्या स्थितीत आहेत असे सर्टिफिकेट गार्डकडे पोहोचवले जाते.हे सर्टिफिकेट पाहून गार्ड त्याच्या डब्यात असलेल्या ब्रेक प्रेशर मशीन मधून ब्रेकची छाननी करतो व ब्रेक व्यवस्थित असेल तर ब्रेक ओके म्हणून रेल्वे चालकाला संदेश देतो.
आता रेल्वे चालू करण्यास हरकत नाही असे गार्डने वॉकी टॉकी वरून सांगताच रेल्वे सुरू होते. त्यानंतर आता रेल्वेने स्टेशनची हद्द पार केली असा झेंडा गार्डने दाखवला की रेल्वे गती घेते. मग प्रवासात पुढे सगळे व्यवस्थित असेल तर तसे रीमार्क मारायला किंवा काही अडथळे आले असतील तर त्याची नोंद करण्याचे काम अखंड प्रवासात गार्डला करावे लागते. रेल्वेला एक दोन मिनिटे उशीर का झाला हे देखील गार्डला नोंद करावी लागते.हे सारे रेकॉर्ड त्याला पुढे पाच वर्षे जपावे लागते. सर्वात महत्त्वाची म्हणजे इमर्जन्सी ब्रेक लावण्याची एक यंत्रनाही गार्डच्या डब्यात पर्याय म्हणून कायमस्वरूपी सज्ज असते.
गाडीच्या डब्यात गार्ड एकटाच असतो.आता त्याच्यासोबत वाकीटॉकी आहे. त्यामुळे तो वॉकी टॉकी वरून रेल्वे ड्रायव्हरच्या संपर्कात सातत्याने असतो .डुलकी हा शब्दही गार्डच्या वाटय़ाला कधी येत नसतो त्याला 14 दिवसात दोन वेळा तीस तास सुट्टी मिळते.मोठय़ा स्टेशनवर रनिंग रूम म्हणून ओळखल्या जाणाया रेल्वे रेस्ट हाऊस मध्ये थ्री स्टार दर्जाची सुविधा मिळते.आपल्या या जबाबदारीची दखल घेऊन आपल्याला गार्ड ऐवजी रेल एक्सप्रेस मेन मॅनेजर हा मुद्दा मिळावा अशी ऑल इंडिया गार्ड कौन्सिल या गार्ड संघटनेची मागणी होती ती आता मान्य झाली आहे.आणि गार्ड आता मेल मॅनेजरच्या अधिकारात हिरवा लाल झेंडा डौलाने फडकवू लागला आहे.
गार्डच्या डब्यात कुत्र्यांसाठीही एक कप्पा…
गार्डच्या डब्यात प्रवाशाला स्थान नसते. पण प्रवाशासोबत मांजर कुत्रे किंवा बकरे असेल तर ते अधिकृतपणे पार्सल विभागाकडून नोंद करून गाडीच्या डब्यातील एका कप्प्यात ठेवले जाते. त्यासोबत त्यांचे खाद्यही ठेवले जाते. अनेक वेळा रेल्वे प्रवासाला भेदरलेले कुत्रे या प्रवासात भुंकुन दंगा घालत असते. पण गार्डला त्याकडे दुर्लक्ष करून आपले काम करावे लागते.
गार्डच्या डब्यात स्ट्रेचर, प्रथमोपचार साहित्य, महत्त्वाची गरजेची औषधे, बॅटऱ्या, तात्पुरत्या प्रकाशाची सोय हे सारे साहित्य असते ते सीलबंद कप्प्यात असते . त्याच्या कुलपावर घाव घातला की हे साहित्य बाहेर काढता येते. आणीबाणीच्या क्षणी त्या साहित्याचा वापर करणे त्यामुळे सोपे जाते.