बाजारपेठेवर परिणाम, नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ
बेळगाव : मागील काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा मुसंडी मारली आहे. दोन दिवसांत पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. रविवारी सकाळी काही काळ उघडीप दिल्यानंतर दिवसभर पावसाचा जोर कायम होता. परिणामी हवेत गारठा निर्माण होऊन जनजीवनही काहीसे विस्कळीत झाले आहे.
हवामान खात्याने सोमवारपर्यंत दमदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार शहरासह तालुक्यातही पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. जुलै मध्यानंतर झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजविला होता. नदी-नाल्यांना पूर येऊन शेतकऱ्यांना फटका बसला होता. त्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा पाऊस अधिक सक्रिय झाला आहे. त्यामुळे नदी काठावरील शेतकऱ्यांमध्येही धाकधूक वाढली आहे.
यंदा हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार आतापर्यंत पावसाने हजेरी लावली आहे. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाच्या विश्रांतीबरोबर कडक ऊनदेखील पहावयास मिळाले होते. त्यानंतर आता पुन्हा पावसाने जोर केला आहे. रविवारी दुपारनंतर पावसाची संततधार कायम होती. ढगाळ वातावरण आणि गारव्यामुळे वातावरणही पूर्णपणे गारठून गेले आहे.
बाजारपेठेवर परिणाम
सण तोंडावर आल्याने बाजारात खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. मात्र बाजारात आलेल्या नागरिकांची पावसामुळे तारांबळ उडाली. संततधार पावसामुळे बाजारपेठेवर काहीसा परिणाम झाला. रविवारच्या साप्ताहिक सुटीमुळे बाजारात आलेल्यांचा पावसामुळे हिरमोड झाला. गोकुळाष्टमी आणि गणेशोत्सवाच्या तयारीसाठी सर्वत्र लगबग पाहावयास मिळत आहे. मात्र पावसाचाही जोर कायम असल्याने उत्साहावर विरजण येत आहे.
राकसकोप, मार्कंडेय, बळ्ळारी नाल्याच्या पाणीपातळीत वाढ
मागील दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे राकसकोप, मार्कंडेय आणि बळ्ळारी नाल्याच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. जुलै महिन्यात राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिरिक्त पावसामुळे जलाशय पूर्णपणे भरले होते. दरम्यान, अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदी पात्रात सोडण्यात आले होते. त्यामुळे मार्कंडेय नदीलाही पूर आला होता. त्याबरोबर बळ्ळारी नाल्यालाही पुराने वेढले होते.