जनजीवन विस्कळीत, दांडिया कार्यक्रमांवर विरजण
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या आठ दिवसांपासून पावसाने बऱयापैकी उघडीप दिली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून उष्म्यामध्ये वाढ झाली होती. शुक्रवारी दुपारी अचानक शहरासह उपनगरांमध्ये पावसाचे आगमन झाले. जवळपास 15 मिनिटे पाऊस पडला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. मात्र सायंकाळी पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली. शहराच्या पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
दुपारी पाऊस काही वेळच कोसळला तरी सायंकाळी मात्र ढगांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले. त्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले. सध्या भातपिकाच्या पोसवणीला जोरदार सुरुवात झाली आहे. त्यामुळे या पिकाला हा पाऊस पोषक ठरला आहे. मात्र अधिक पाऊस झाला तर भातपिकालाही फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
सायंकाळी पुन्हा पावसाचे आगमन झाले. नवरात्र असल्यामुळे विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम होते. त्या कार्यक्रमांसाठी जाणाऱया भाविकांना या पावसाचा त्रास सहन करावा लागला. याचबरोबर सध्या दांडिया तसेच इतर कार्यक्रमदेखील आयोजित केले होते. त्यांनादेखील या पावसाचा फटका बसला आहे.
कडोली व मच्छे येथे झालेल्या पावसामुळे शेतकरी व नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाने हजेरी लावल्याने बटाटे व रताळी काढणी खोळंबली आहे. तर भातपिकांना हा पाऊस पोषक ठरला आहे.