विशेष प्रतिनिधी/ पणजी
गेल्या आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर काल बुधवारी पुन्हा एकदा पावसाचे आगमन गोव्यात झाले. येत्या दि. 22 ऑगस्टपर्यंत राज्यात सर्वत्र मध्यम तथा हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार, असा अंदाज हवामान खात्याने बुधवारी व्यक्त केला.
हवामान खात्याने पावसाबरोबर जोरदार वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यासाठी येलो अलर्टही जारी केला आहे. दि. 20 ऑगस्टपर्यंत समुद्र खवळलेला राहील. मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे.
बुधवारी गोव्यातील बहुतांश भागात पावसाचे पुनरागमन झाले. राजधानी पणजीसह सत्तरीपर्यंत सर्वच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. दक्षिण गोव्यातील काही भागातच पाऊस पडल्याचे वृत्त आहे. यंदा मोसमात 100 इंच पाऊस पडल्यानंतर पावसाने बरेच दिवस विश्रांती घेतली होती. बुधवारपासून पाऊस पुन्हा सुरू झाला.