खरिप पिकांना जीवदान : अजूनही दमदार पावसाची गरज
वार्ताहर /किणये
काकती-होनगा परिसरात तासभर पावसाच्या सरांच्या सलामीमुळे शेतकरीवर्ग आनंदित झाला आहे. यामुळे खरिप पिकांना जीवदान मिळाले आहे.
मंगळवारी सकाळी काकतीत तासभर पावसाच्या सरींनी हजेरी लावली. त्यामुळे 15 दिवसांपूर्वी पेरणी केलेल्या भात उगवणीला पोषक वातावरण मिळाले आहे. गेले 15 दिवस पाऊस नसल्याने भाताची उगवण विरळ-खंडित झाल्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत होता. मात्र, या पावसाने दिलासा मिळाला असून उगवण न झालेले भात उगवेल, अशी आशा व्यक्त होत आहे. होनगा परिसरात हलका पाऊस पडला असून माळरानातील पिकांना उगवणीसाठी अनुकूल झाला आहे. भुईमूग, कपाशी, मका पिकांची तुरळक उगवण झाली आहे. मात्र, दमदार पावसाची गरज आहे. उगवण झालेल्या पिकांतून आंतरमशागतीची कामे चालू असून तण काढण्यासाठी बैलजोडींनी कोळपणीची कामे सुरू केली आहेत.
जून महिना संपत आला तरी अद्याप मान्सून स्थिरावला नाही. पूरक पावसासाठी वातावरण तयार झाले आहे. मृग नक्षत्राने निराशा केली असून बुधवार दि. 22 पासून सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. या पावसाकडे आता शेतकरी बांधवांचे लक्ष वेधले आहे. या नक्षत्रात चांगला पाऊस होऊन उघडीप मिळाल्यास बटाटा पिकांची लागवड तालुक्यात होणार आहे. सोयाबीन पेरणीचा थांबलेला हंगामही साधला जाणार आहे.