ऑनलाईन टीम/तरुण भारत
पावसाळा सुरु झाला की पावसात भिजणे आणि गरमा-गरम भज्जी खाणे याची मजा काही औरचं. मात्र एकदम असे पदार्थ खाल्याने याचा तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्रास होवू लागतो. कारण पावसाळ्याच्या दिवसात पचनसंस्था नाजूक होते. तर प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणूनच या दिवसात आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. यासाठी नेहमीच तज्ञ आहाराबाबतीत सल्ला देत असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला तुमचं आहाराकडे लक्ष असणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात सुरवातीला आहारात कशाचा समावेश करावा आज हे जाणून घेणार आहोत.पावसाळ्यात चौरस पण सुरक्षित आहार, हे सूत्र पाळायला हवे. प्रतिकारशक्ती व पचनसंस्थेची ताकद वाढविणाऱ्या अन्नपदार्थांचा समावेश करा. पावसाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण कमी असते. यामुळे अनेक आजार उध्दभवतात. यासाठी घड्याळ लावून पाणी पिले पाहिजे. बाहेर काम करत असणाऱ्या महिलांनी याची विशेष काळजी घेतली पाहिजे.
या भाज्यांचा वापर करा
पावसाळ्यात पालेभाज्या या लवकर खराब होतात. त्यांची साठवण करून ठेवणे शक्य होत नाही. अशावेळी भेंडी, वांगी, दोडके, पडवळ यांचा आहारात समावेश करा. यासोबत पोकळा म्हणजे लाल माठाची भाजी खा. या ऋतूमध्ये ही सर्वोत्तम मानली जाते. या भाजीत क्षार अधिक असल्याने आयुर्वेदीयदृष्टय़ा पावसाळ्यात भाजीचा उपयोग उत्तम मानला जातो. तसेच वालच्या शेंगांची भाजी खा. कडधान्यामध्ये मुगाचा वापर जादा करा. फळांमध्ये सफरचंद, चिक्कू, डाळींब मर्यादित प्रमाणात स्वच्छतेची काळजी घेऊन खाणे उपयुक्त ठरते.
प्रतिकारशक्ती व पचनसंस्थेची ताकद वाढवा
पावसाळ्याच्या दिवसात जड पदार्थ खाणे टाळा. प्रतिकारशक्ती व पचनसंस्थेची ताकद वाढवण्यासाठी आहारात गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, ओट्सचा समावेश करा. पोळी, भाकरी, थालीपीठ, पराठे जास्त खावेत. नाचणी, शिंगाडा, हातसडीचा तांदूळ यांचाही आहारात वापर करता येईल. प्रतिकारशक्ती व पचनसंस्थेची ताकद वाढविण्यासाठी याचा उपयोग होतो. पचनशक्ती उत्तम राहण्यासाठी उकळून थंड केलेले पाणी आणि मध हे मिक्स करून पिऊ शकता. पचनाच्या तक्रारी कमी करण्यासाठी पुदिना आणि हिंगाचा वापर करा.
दुग्धजन्य पदार्थाचा वापर करताना याची काळजी घ्या
दुग्धजन्य पदार्थाचा वापर करताना त्यात सुंठ, आले किंवा आल्याचा रस, काळी मिरी, सैंधव घालून जेवणाच्या अगोदर पिल्यास वात कमी होतो. दुधाचे नासवलेले पदार्थ खाऊ नये. दुधाबरोबर लोणी लावून भाजलेला पाव खावू शकता. टेस्टही छान लागते आणि तुमचे पोटही भरलेले राहते.
हे सूप पिऊ शकता
पावसाळ्यात भाजांचे सूप प्यायला जादा पसंदी दिली जात नाही. मात्र तुम्ही जर यामध्ये कुळीथ व उडीद तसेच तांदळाचा वापर करुन सूप बनवू शकता. पचनाचे त्रास तसेच इतर त्रास असणाऱ्यांनी तांदळाचे सैंधव जीरेयुक्त सूप (पेज) घेणे हा उत्तम आहार ठरतो. तुम्ही टोमॅटो सूप करत असताना जिरे, आले टाकून तुपाची फोडणी दिलेले सूपही पिऊ शकता.