पुणे / प्रतिनिधी :
राज्यात सध्या पावसाचा जोर ओसरला असला, तरी पुढील तीन दिवसांत राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
जूनमधील दीर्घ खंडानंतर जुलैमध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत पावसाने दाणादाण उडविली. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडय़ापर्यंत सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक जिल्हय़ांमध्ये तब्बल दहा दिवस सूर्यदर्शन होऊ शकले नाही. पावसाची ही झड मागच्या दोन ते तीन दिवसांपासून मात्र मंदावल्याचे दिसत आहे. मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली. तर काही भागांत हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली. गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीलगत द्रोणीय पट्टा कायम असून, विदर्भ, मराठवाडा, कोकणासह राज्याच्या काही भागांत पावसाची नोंद झाली. आगामी 4 ते 5 दिवसांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याग्नची शक्मयता असून, पुढील तीन दिवसांत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.
पुढील दोन दिवस महाराष्ट्रात कमी-अधिक प्रमाणात पावसाची स्थिती कायम राहणार आहे. सोमवारी गोंदिया आणि गडचिरोली जिल्हय़ाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि उस्मानाबाद हे चार जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात सोमवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्याच्या काही भागांत नोंदविण्यात आलेला पाऊस पुढीलप्रमाणे : पुणे 0.2, कोल्हापूर 9, महाबळेश्वर 19, सांगली 6, सातारा 1, सोलापूर 24, मुंबई 0.4, रत्नागिरी 0.1, डहाणू 0.5, परभणी 6, अमरावती 1, बुलढाणा 2, ब्रम्हपुरी 12, गोंदिया 19, नागपूर 6, वर्धा 1.
हेही वाचा : कराड पोलिसांची दरोडेखोरांशी झटापट, एकाला पकडले