उघडिपीची प्रतीक्षा, बटाटा कुजण्याची भीती : शेतकरी अडचणीत
बेळगाव / प्रतिनिधी
तालुक्याच्या पश्चिम भागात तुरळक प्रमाणात बटाटा काढणीला प्रारंभ झाला होता. मात्र, मागील आठवडाभरापासून पावसाने धुमाकूळ घातल्याने बटाटा काढणीत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे बटाटा उत्पादक उघडिपीच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा अति पावसामुळे बटाटा पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची चिंता व्यक्त होत आहे.
मागील काही वर्षांपासून बटाटा लागवडीत घट झाली आहे. यंदा बटाटा लागवडीत उच्चांकी घट झाली आहे. काही प्रमाणात शनिवारपासून पाऊस ओसरला आहे. पावसाने उघडीप दिल्यास येत्या दोन दिवसात पुन्हा बटाटा काढणीला प्रारंभ होणार आहे. तालुक्यातील बेळगुंदी, बेळवट्टी, बडस, बिजगर्णी, कावळेवाडी, बसुर्ते, कोनेवाडी, अतिवाड, बेकिनकेरे, कल्लेहोळ, चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी, बोडकेनट्टी, हंदिगनूर, मण्णिकेरी, बाची, कुदेमनी आदी भागात बटाटा लागवड करण्यात आली आहे.
विशेषतः हंदिगनूर भागातील केदनूर, मण्णिकेरी, चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी, बोडनेकहट्टी भागात अधिक प्रमाणात बटाटा लागवड होते. मात्र, यंदा या भागात बटाटा लागवडीचे प्रमाण कमी झाले आहे. अलीकडेच्या काही वर्षात बटाटय़ाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे बटाटा उत्पादनातून मिळणाऱया पैशापेक्षा लागवडीचा खर्च वाढल्याने बटाटा लागवडीत घट झाली आहे. शिवाय बटाटा कुजण्याचे प्रमाण वाढले आहे. बटाटा उत्पादन कमी झाल्याने शेतकऱयांना तोटाच सहन करावा लागत आहे. त्यामुळे बटाटा उत्पादकांनी बटाटा लागवड कमी केल्याची बाब समोर आली आहे.
अतिपाऊस, नैसर्गिक आपत्ती, रासायनिक खताच्या वाढत्या किमती, उत्पादनात झालेली घट यामुळे बटाटा लागवडीवर परिणाम झाला आहे. साहजिकच उत्पादनात देखील घट झाली आहे. अतिपावसामुळे यंदा बटाटा पिकावर परिणाम झाला असून बटाटा कुजला आहे. गेल्या दोन-चार वर्षात बटाटा उत्पादनावर परिणाम होऊन फटका बसत असल्याने शेतकरी रताळी उत्पादनाकडे वळला आहे. जुलै आणि सध्या होत असलेल्या पावसामुळे नदीकाठावरील शेती पाण्याखाली गेली होती. त्यामुळे भात पिकाबरोबर बटाटा, भुईमूग, रताळी, सोयाबीन, मका आदी पिकांना फटका बसला आहे.