कोल्हापूर- गेल्या २४ तासांत कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने पंचगंगा नदीसह जिल्ह्यातील नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सकाळी अकरा वाजता पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी २५ फुटांवर होती. पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दल सज्ज झाला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा आढावा घेत राष्ट्रीय आपत्ती दल सज्ज ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
सध्या पंचगंगा नदीवरील १५ बंधारे पाण्याखाली गेलेअसून शहरांसह धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात २८२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून एनडीआरएफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. विशेषत: रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीची वेळीच सूचना द्यावी. तसेच पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावे लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद
धरणक्षेत्रातील गगनबावडा २८२ मिमी, शाहूवाडी २३६ मिमी, राधानगरी १७५ मिमी , भुदरगड १४५ मिमी, चंदगड १०८ इतक्या पावसाची नोंद झाली आहे.