तरुणभारत ऑनलाइन टीम
उन्हाळ्यात उष्णतेमुळे हैराण झाल्यामुळे सगळ्यांनाच पावसाळा हवाहवासा वाटतो. सर्वजण पावसाची मोठ्या आतुरतेने वाट पहात असतात.पण पावसाळ्यात वातावरणात अचानक बदल होत असल्याने तसेच दूषित पाणी यामुळे विविध आजारसुद्धा पसरण्याची शक्यता असते.परिणामी शरीराची रोग प्रतिकारक शक्तीदेखील कमी होत असते.मग अशावेळी आपण काय काळजी घ्यायला हवी हे पाहूया.
१. पावसाळ्याच्या दिवसांत बाहेरचे पदार्थ किंवा उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत. पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेमुळे बाहेरच्या पदार्थांमधील पोषक घटक निघून जातात व जंतूसंसर्गाचा धोका निर्माण होतो.त्यामुळे बाहेरचे अन्न खाणे टाळावे.
२.दूषित पाण्यामुळे पावसाळ्यात अनेक आजार होऊ शकतात.त्यामुळे पाणी उकळून प्यावे.त्याचबरोबर पावसाळ्यात कमी तहान लागते त्यामुळे आपोआप कमी पाणी प्यायले जाते. पण स्वास्थ्य राखण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती साठी, शरीराला साधारण ३ लिटर पाण्याची गरज असते. पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे.
३.स्वयंपाक करण्यासाठी पचनास हलके तेल वापरावे. मोहरीचे तेल, शेंगदाण्याचे तेल आणि बटर वापरण्याऐवजी तूप, ऑलिव्ह ऑइल आणि सूर्यफूलाचे तेल वापरावे. पचनास जड असणारे तेल खाल्याने शरीरातील उष्णता वाढते.
४. पावसाळ्यात हवेत ओलावा असल्यामुळे फळे व भाज्यांवर धूळ व कचरा बसतो. त्यामुळे फळे व भाज्या स्वच्छ धुवून मगच खाव्यात.
५. बाहेरून घरी आल्यानंतर किंवा जेवणाआधी, काहीही खाण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवावेत. त्याचबरोबर
सॅनिटायझरचा वापर करा.
६. पावसाळ्यात मांसाहार टाळावा.कारण पावसाळ्यात पचनसंस्था थोडी अशक्त झालेली असते त्यात जर खूप क्लिष्ट आणि पचायला जाड पदार्थ खाल्ले तर आजारी पडण्याची शक्यता असते.
७.त्वचेचे इन्फेक्शन टाळण्यासाठी जेवणात कडू भाज्यांचा समावेश करा. जसे की मेथी, कार्ले, कडुलिंब इ. ह्या भाज्यांमधील रसायने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
८.या दिवसात डासांचे प्रमाण वाढते.तसेच घरात किंवा घराच्या आसपास पाणी फार काळ साठून राहणार नाही ह्याची काळजी घ्या.तसेच डासांना दूर ठेवणाऱ्या क्रीमचा वापर करा.
९. पालेभाज्या, फळे वापरताना मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवाव्यात.
१०. फ्रिजमधील अतिथंड पाणी पिणे, कोल्ड ड्रिंक्स, आइसक्रीम यामुळे भूक मंदावते. सर्दी, खोकला यासारखे आजार लवकर होतात.