अभिनेते अनुपम खेर यांचे गौरवोद्गार : ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना चतुरंगचा जीवन गौरव बहाल
प्रतिनिधी /फोंडा
चित्रपट क्षेत्रात एक ध्यास व तत्त्वनिष्ठेने प्रदीर्घकाळ टिकून काम करणाऱया व्यक्ती आज दुर्मिळ होत चालल्या आहेत. त्यामुळेच ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त सारख्या व्यक्ती आजच्या पिढीतील कलाकारांसाठी प्रेरणास्रोत ठरतात. वयाची नव्वदी पार केलेले राजदत्त ही एक उर्जा व प्रेरणा आहे. चित्रपट निर्मिती हीच जीवनधारणा म्हणून जगलेल्या या चित्रतपस्वींना चतुरंगचा जीवन गौरव सन्मान लाभणे हा या पुरस्काराचाही गौरव आहे, असे उद्गार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी काढले.
चतुरंग प्रतिष्ठानतर्फे रविवार फोंडा येथे आयोजित केलेल्या 32 व्या रंगसंमेलनात भारतीय चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. फोंडा येथील राजीव गांधी कलामंदिर झालेल्य़ा या सोहळय़ाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत अनुपम खेर यांच्याहस्ते राजदत्त यांना हा पुरस्कार देण्यात आला. आजच्या चित्रपट क्षेत्रात राजदत्तांसारखी निष्ठा व समर्पित भावना कमी होत चालली आहे, अनुपम खेर पुढे म्हणाले. या पुरस्काराच्या रक्कमेत आपल्या थिएटर आर्ट संस्थेतर्फे दरवर्षी अतिरिक्त रु. 2 लाख जमा केले जातील व यापुढे पुरस्काराची रक्कम रु. 5 लाख करण्याचा प्रस्ताव त्यांनी आयोजकांसमोर मांडला. हा प्रस्ताव चतुरंग संस्थेतर्फे स्वीकारला गेल्यास, आपली संस्था व त्यात शिकणाऱया कलाकारांचा हा सन्मान ठरेल असे अनुपम खेर यांनी जाहीर केले.
रु. 3 लाख रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या जीवन गौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष म्हणून अनिवासी भारतीय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, पुरस्कार निवड समितीचे सदस्य सुधीर जोगळेकर व डॉ. अजय वैद्य हे उपस्थित होते.
गोमंतकीय राजदत्तचे कायम ऋणी राहतील
समाजातील वास्तव व महान व्यक्तींचे जीवन चित्रपटांतून समाजासमोर मांडणे हे राजदत्त यांचे मोठे कार्य आहे. दूरदर्शनवरील त्यांच्या ‘गोटय़ा’ या लोकप्रिय मालिकेमुळे आपण सर्वाधिक प्रभावी झालो, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. 1955 सालच्या गोवा मुक्तीसंग्रामात महाराष्ट्र व अन्य प्रांतातून स्वातंत्र्य सैनिकांच्या ज्या तुकडय़ांनी विविध सिमांवरुन गोव्यात प्रवेश केला त्यात राजदत्त यांचाही समावेश होता. गोवा व गोमंतकीय त्यांच्या या कार्याबद्दल कायम ऋणी राहील असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले. संस्कार भारतीच्या स्थापनेपासून देशभरात लाखो कलाकार घडविण्याचे त्यांचे कार्यही खूप मोठे आहे असा उल्लेख त्यांनी केला.
वाईटातून चांगले शोधणे हा राजदत्तांचा स्वभावधर्म : कुवळेकर
राजदत्त यांच्या चित्रपटात केवळ कलाकार बोलत नाहीत, तर संपूर्ण वातावरण बोलते हे त्यांच्या दिग्दर्शनाचे खरे कौशल्य आहे, असे विजय कुवळेकर म्हणाले. सावरकर या मालिकेत त्यांच्या हाताखाली अभिनय करताना आलेल्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या. वाईटातून चांगले शोधणे हा त्यांचा स्वभावधर्म आहे. एका विशिष्टय़ ध्येयाने झपाटलेल्या व जीवनमुल्यांशी कधीही तडजोड न करणाऱया एका उत्तुंगतेला केलेला मानाचा मुजरा म्हणजे राजदत्तना लाभलेला हा जीवन गौरव आहे असे त्यांनी नमूद केले.
गोमंतकीय माणसांचा मोठेपणा लतादीदींमध्ये दिसला
राजदत्त यांनी आपल्या मनोगतात गोव्याच्या मुक्तीसंग्रामात 1954 मध्ये दादरा नगरहवेली ते गोवा या पर्वांतील आठवणी सांगताना येथील माणसांच्या मनाचा मोठेपणा लता मंगेशकर यांच्यामध्ये दिसल्याचे सांगितले. महाराष्ट्र व अन्य राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या तुकडय़ांनी विविध सिमांवरुन गोव्यात प्रवेश करण्याचा बेत आखला होता. पण या कार्यात जेव्हा पैशांची चणचण उभी राहिली, तेव्हा सुधीर फडके अर्थात बाबुजींनी ठिकठिकाणी गाणी गाऊन हा निधी उभारण्याचा खटाटोप चालविला. गोमंतकीय कन्या लतादीदींना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी तुम्ही तुमचे कर्तव्य करा, पैशांसाठी धावपळ करु नका याची हमी दिली व पूर्णही केली. पण या गोष्टीचा त्यांनी कुठेच कधी उल्लेख केला नाही. चित्रपट निर्मितीच्या सुरुवाच्या काळात सावरण्यासाठी त्यांनीच आधार दिला म्हणून राजदत्ताचा जीवनप्रवासाला गती मिळाली. अशा व्यक्ती गोमंतभूमित जन्मल्या व त्याच भूमित जीवनगौरव लाभला यापेक्षा मोठे भाग्य नाही असे भावोद्गार त्यांनी काढले.
चतुरंगचे गोव्यातील कार्यकर्ते डॉ. दत्ताराम देसाई यांनी प्रास्ताविकात पुरस्कार व चतुरंगच्या एकंदरीत कार्याचा आढावा घेतला. प्रमोद पवार यांनी मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी तर श्रीकुमार सरज्योतीषी यांनी आभार मानले.
रंगसंमेलनाच्या पहिल्या सत्रात प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी यांची मुलाखत झाली. सचिन चाटे यांनी संवादक म्हणून काम पाहिले. गोव्यातील लोककलेचे अभ्यासक पद्मश्री विनायक खेडेकर यांच्याहस्ते ‘फटमार’ करुन संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष ऍड. नरेंद्र सावईकर हे उपस्थित होते. खेडेकर व ऍड. सावईकर यांनी चतुरंगच्या या कार्याला शुभेच्छा दिल्या. त्यानंतरच्या सत्रात जनार्दन वेर्लेकर यांच्याहस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्राचार्य अनिल सामंत यांनी स्मरणिकेतील आशय विषय प्रेक्षकांसमोर मोडला.