ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईतील 1140 मशिदींपैकी 135 मशिदींमध्ये आज सकाळी 5 च्या आत अजान झाली. त्यावर पोलीस कोणती कारवाई करणार आहेत? की फक्त मनसैनिकांना उचलणार आहेत. कायद्याचे पालन न करणाऱ्यांना मोकळीक मिळते आणि पालन करतात त्यांची धरपकड होतेय. भोंग्यांविरोधातील आंदोलन हे धार्मिक नाही. सामाजिक आहे. त्याला धार्मिकतेचा रंग देऊ नका. अन्यथा आम्हालाही धर्म मध्ये आणावा लागेल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक मशिदी अनधिकृत आहेत. अनधिकृत मशिदींना भोंग्यांची परवानगी मिळाली तर हनुमान चालीसा वाजवणारच. भोंग्यांविरोधातील आंदोलन एक दिवसाचे नाही. मशिदींवरील भोंगे उतवरणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. राज्यातील शांतता बिघडवण्याचा आमचा हेतू नाही. हा सामाजिक विषय आहे. अनेकांना या भोंग्यांचा त्रास होतो. या विषयाला धार्मिक रंग देऊ नका. नाहीतर आम्हालाही धर्म मध्ये आणावा लागेल. दरम्यान, मुंबईत 1005 मशिदींवर आज भोंगे लागले नाहीत. भोंगे न लावणाऱ्या मौलवींचे मी आभार मानतो. त्यांना आमचा विषय समजला आहे. यापुढेही त्यांनी भोंगे न लावता अजान करावी.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन तुम्हाला करायचं असेल तर त्यांनी दिलेल्या डेसिबलचं पालन करावं लागेल. लोकवस्तीमध्ये 45 ते 55 डेसिबलपर्यंत स्पीकर लावू शकता. आम्हाला सणांसाठी दिवस बघून परवानगी देता आणि मशिदींवरील भोंग्यांना 365 दिवस परवानगी कशासाठी देता?, असाही सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.