ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारच्या निर्देशानंतर मंदिर आणि मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या भोंगे उतरवण्याच्या कारवाईनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केलं आहे. तर महाराष्ट्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
राज्याच्या राजकारणामध्ये मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये ११ हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आलेत तर ३५ हजारांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचं निश्चित करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या योगी आदित्यनाथ सरकारवर कौतुकाचा वर्षाव केलाय. मात्र त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणाऱ्या ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
“उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्या बद्दल योगी सरकारचे मन:पुर्वक अभिनंदन आणि आभार”, असा शब्दांत राज ठाकरे यांनी योगींचे कौतुक केलं आहे. तसंच, याच पत्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे “आमच्या महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाहीत आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना”, असा शब्दांत राज ठाकरेंनी हल्लाबोल केला.