ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आपण गुजरातचे आहोत, म्हणून गुजरातला प्राधान्य देणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभत नाही. त्यांनी प्रत्येक राज्याकडे समान बघण्याची गरज आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटले आहे.
पुण्यात “व्यंग, वास्तव आणि राजकारण” या विषयावर 18 वे जागतिक मराठी साहित्य संमेलन भरवण्यात आले आहे. या संमेलनातील ‘शोध मराठी मनाचा’ या परिसंवादात राज ठाकरे यांची प्रकाश अकोलकर आणि प्रभाकर वाईरकर यांनी मुलाखत घेतली. त्यावेळी राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. देशातील प्रत्येक राज्य हे समान मुलासारखं असलं पाहिजे. आपण गुजरातचे आहोत म्हणून गुजरातला प्राधान्य देणे पंतप्रधानांना शोभत नाही. माझी 2014 ची भाषण काढून पाहा, पंतप्रधान झाल्यावर मोदींनी पहिली पाच वर्ष उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहारकडे लक्ष द्यावं असं मत मी मांडलं होतं. आजही माझं तेच मत आहे. जर त्या माणसाने चांगलं काम केलं त्याचं अभिनंदन करण्याचा मोकळेपणा सुद्धा तुमच्यामध्ये असला पाहिजे. कलम 370 कलम रद्द करणे, राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागणे या चांगल्या कामाचं मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं आहे.
अधिक वाचा : राज्यपाल होणं म्हणजे दु:खच दु:ख
राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पाबाबत ते म्हणाले, महाराष्ट्र हे श्रीमंत राज्य आहे, सर्वार्थाने अग्रेसर आहे. जे आहे ते जरी टिकवलं तरी महाराष्ट्र पुढे आहे. एक-दोन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने फारसा फरक पडत नाही.