ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसे आणि हिंदुत्ववादी संघटना उद्या अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर राज्यातील प्रत्येक शाखेमध्ये महाआरती करणार होते. पण राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर महाआरतीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका नेमकी काय असणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना राज ठाकरेंनी (raj thackeray) एक ट्विट केले आहे. पुढे नेमकं काय करायचं आहे, हे मी उद्या ट्विटद्वारे सांगेन, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं, हे मी उद्या माझ्या ट्वटिद्वारे आपल्यासमोर मांडेन.”
दरम्यान, राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी सरकारला उद्यापर्यंत (दि. 3) अल्टीमेटम दिला आहे. तर ईदनंतर मशिदींबाहेर भोंगे वाजले तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याच्या सूचनाही राज ठाकरे यांनी मनसैनिकांना रविवारी दिल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरे उद्या काय भूमिका घेणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.