महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक श्री राज ठाकरे यांची मंगळवारी बारा तारखेला ठाणे येथे उत्तर सभा झाली. गुढीपाडवा मेळाव्यात त्यांनी केलेल्या भाषणावर अनेकांनी टिका टिप्पण्णी केली होती. त्याला उत्तर देण्यासाठी या उत्तर सभेचे आयोजन करण्यात आले होते. नेहमीप्रमाणे खचाखच गर्दी, सभेत टिंगल-टिका, नकला आणि अंगावर आलेल्या राष्ट्रवादीला व शिवसेनेला शिंगावर घेत दिलेले उत्तर यामुळे ही सभाही गाजली. ‘अ’ म्हणा ‘ब’ म्हणा किंवा ‘ठ’ म्हणा राज ठाकरे मुलूख मैदान तोफेसारखे बरसतात आणि जनतेचे प्रश्न घेऊन संबंधितांच्या वर्मी घाव घालतात हे यानिमित्ताने पुन्हा दिसून आले. राज ठाकरे यांची पूर्व सभा आणि उत्तर सभा यांचे एकच मर्मभेदी लक्ष आहे आणि ते आहे ‘काढा रे तो भोंगा’. लाव तो व्हिडिओ नंतरचा ‘काढा रे तो भोंगा’ प्रयोग सुरू झाला आहे हा प्रयोग म्हणजे आंदोलन आहे ते कोणत्या धर्माविरूध्द वा प्रार्थनेविरूध्द नाही पण, जनसामान्यांना होणाऱया त्रासाविरोधात ध्वनी प्रदूषणाविरोधात आहे. ओघानेच ते गाजणार, वाजणार हे वेगळे सांगायला नको. दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर उत्तरची चुरशीची पोटनिवडणूक निकालाच्या प्रतीक्षेत आहे. मतदान झाले आता तेथे निकाल काय येतो ते पहायचे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना आहे. दिग्गज मंडळी प्रचारात उतरली असली आणि उमेदवार लढत असले तरी खरा सामना आजी-माजी पालकमंत्र्यात म्हणजे बंटी पाटील व चंद्रकांत पाटील यांच्यात आहे. महाविकास आघाडी विरुध्द भाजपा यांच्यात आहे. एखाद्या सदस्यांच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक होते की सहसा स्थानिक मुद्यावर व सहानुभूतीच्या वातावरणात होत असते पण अलीकडे झालेली पंढरपूर असो कोल्हापूर उत्तर असो या निवडणुका राज्य सरकार महाविकास आघाडी आणि खरे हिंदुत्व या मुद्यावर फिरताना दिसल्या. शिवसेना, भाजपा सोबत युती करुन निवडून आली. आणि पवारांच्या महाआघाडीच्या प्रयोगात सहभागी झाली. त्यानंतर राज्यात जे-जे सुरु आहे ते केवळ राजकारण, आरोप-प्रत्यारोप, वसुली, तोडपाणी आणि खटले, तुरुंग, ईडी व अन्य त्यामुळे सर्वसामान्य खरोखर वैतागले आहेत. पक्ष कोणताही असो चिखलफेक कशीही होत असो जे पकडले, सापडले त्यांच्याकडे मोठे घबाड मिळाले आहे. हे नाकारता येत नाही. ओघानेच ही चिखलफेक जोराची व्हावी आणि राजकारणाची स्वच्छता होऊन दूध का दूध, पानी का पानी व्हावे अशी जनसामान्यांची इच्छा असली तर ती चुकीची नाही. या दरम्यान ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण असे मुद्दे तापलेले आहेत. महाराष्ट्रात जातीचे राजकारण पेटताना दिसत आहे. अशावेळी राज ठाकरे यांनी ‘काढा रे तो भोंगा’ सोबत समान नागरी कायदा करा असा पुर्नउच्चार केला आहे. भाजपाचाही तो अनेक वर्षाचा मुद्दा आहे. लोकशाही टिकायची असेल आणि सर्व जाती-जमाती, धर्म, लिंग यांना न्याय द्यायचा असेल तर समान नागरी कायदा ही गरज आहे. अन्यथा अनेक अडचणी व समस्या यांना सतत सामोरे जावे लागेल. जी गोष्ट समान नागरी कायद्याची तीच गोष्ट आरक्षणाची. आरक्षण हवे पण ते गरिबांना, मागासांना, पिढय़ान् पिढय़ा लाभ घेणाऱयांना आणि सातवे वेतन व सवलती उपभोगणाऱयांना थोडे बाजूला करुन गरीब, उपेक्षित, मागास, दुर्लक्षित परिवारांना आरक्षण दिले पाहिजे. असो असा जो आवाज बाळासाहेब ठाकरे, आण्णासाहेब पाटील, शालिनीताई पाटील यांनी उठवला होता त्या संदर्भाने निर्णय झाले पाहिजेत. मतांची पेटी आणि सत्तेचे राजकारण व धनदांडगे, जातदांडगे यांचे तुष्टीकरण सत्ता राखण्यासाठी उपयुक्त ठरणार असले तरी ते न्यायाचे असेलच असे नाही. ओघानेच देशातील सर्वसामान्य जनता बलशाली करायची असेल तर काही निर्णय कठोर वाटले तरी ते घेतले पाहिजेत. राज ठाकरे यांनी मध्यंतरी लाव तो व्हिडीओ म्हणत भाजप व नरेंद्र मोदी यांना लक्ष केले हेते पण पाच राज्यातील निवडणूक कौल, 370 कलम रद्द व अन्य कामे या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपले सध्याचे लक्ष बदलले. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना सध्या त्यांच्या रडारवर दिसते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला, जाती-जातीत द्वेष पसरला. असे आरोप करत राज ठाकरे यांनी अजित पवार, छगन भुजबळ, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेली टिका आणि जयंत पाटील यांची केलेली मिमिक्री दुर्लक्ष करण्यासारखी नाही. चित्रकार शि. द. फडणीस यांचे एक हास्यचित्र आहे. पूर्वी दिवाळी अंकातून ते प्रकाशित झाले आहे. वृक्षारोपणानंतर रोपाच्या आधाराला लावलेल्या काठीला पालवी फुटली व रोप आहे तसेच राहते. राज ठाकरे यांचा परफॉर्म आणि घरादारातून त्यासंदर्भात उमटलेली लोकभावना पाहता राज ठाकरेंची बी टीम कधीही ए टीम होऊ शकते हे लक्षात घेतले पाहिजे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात खासदार सुप्रिया सुळे यांचाही समाचार घेतला. त्यांचे दाखवायचे दात आणि खायचे सुळे वगैरे शाब्दिक कोटय़ा केल्या. अजित पवार, त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक यांच्या पाठीशी ईडी लागते पण त्याच घरात सुप्रिया सुळेंकडे ईडीचे दुर्लक्ष कसे होते असा सवाल करत शरद पवार पंतप्रधानांना वारंवार भेटतात आणि त्यानंतर एक एक जणांवर कारवाई होते यामागे काय रहस्य आहे असे म्हणत राज ठाकरे यांनी संशयाचा पलिताही नाचवला आहे. राहिला मुद्दा भोंग्याचा, राज ठाकरे यांनी 3 मे ची डेडलाईन दिली आहे. 3 मे पर्यंत भोंगे उतरवा अन्यथा हनुमान चालीसा आंदोलन अपरिहार्य आहे. आपल्या भात्यात अनेक बाण आहेत काढायला लावू नका. अंगावर केस घेऊन आपले अस्वल झाले आहे आणखी चार केसेस अंगावर आल्या तरी घाबरत नाही असे त्यांनी सांगितले आहे. आपणास सलोखा, शांतता, सुव्यवस्था राखायची आहे. पण 365 दिवस दिवसातून पाच वेळा असंख्य मशिदीतून कर्णकर्कश भोंगे सहन होत नाहीत अशी भावनाही त्यांनी मांडली. ओघानेच रमजान नंतर संघर्षाचे प्रसंग येऊ शकतात हे लक्षात घेतले पाहिजे आणि राज्य सरकारसह विविध जाती-धर्मांनी शहाणपणाची व चांगल्या नागरिकत्वाची भूमिका स्वीकारली पाहिजे. तूर्त ‘उतरव बरे तो भोंगा’ हाच विषय तापेल असे दिसते आहे.
Previous Articleमहाकवी कालिदासाचे ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’ (31)
Next Article जोकोविचला पराभवाचा धक्का
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.