ऑनलाईन टीम / पुणे :
मशिदींवरील भोंगे हटवण्याची मोहिम धार्मिक नाही, सामाजिक आहे. मुस्लिम लोकांनाही भोंग्यांचा त्रास होतोच. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी हा विषय धर्मावर नेऊ नये. राज्यात शांतता भंग करण्याची गरज नाही. आमच्या मिरवणुकींवर दगडफेक करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे की, आमचेही हात बांधलेले नाहीत, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackreay) यांनी म्हटले आहे.
पुण्यात एका पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, मशिदिवरील भोंगे शांतता भंग करत असतील तर त्यांना परवानगी देऊ नका असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. मुस्लिम समाजालाही समजले पाहिजे की या देशापेक्षा त्यांचा धर्म मोठा होऊ शकत नाही. हा सामाजिक विषय आहे. लोकांना भोंग्यांचा त्रास होत आहे. त्यामुळे 3 मे नंतर भोंगे हटवावेत. दरम्यान, आमच्याकडून मिरवणूक निघत असताना त्यावर दगडफेक होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, आमचे हात काही बांधलेले नाहीत. दगड आम्हालाही हातात घेता येतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या पत्रकार परिषदेतून राज ठाकरे यांनी दोन मोठय़ा घोषणा केल्या आहेत. एक म्हणजे येत्या 1 मे ला संभाजीनगर येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. तर 5 जून रोजी राज ठाकरे आपल्या सहकाऱ्यांसोबत अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.