श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या मतदार यादीवर दोन्ही बाजूने हरकती घेण्यात आल्या होत्या. या हरकतींवर मा. प्रादेशिक सहसंचालक(साखर) कोल्हापूर विभाग यांच्यासमोर दिनांक 1 मार्च रोजी सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूनी आपले मत मांडले होते. सदर सुनावणीचा निकाल आज देण्यात आला. यामध्ये 1899 सभासदांवर विरोधी सतेज पाटील गटाने आक्षेप नोंदवलेला होता. पण सुप्रीम कोर्टानंतर आता प्रादेशिक सहसंचालकांनीही पुन्हा एकदा हा आक्षेप फेटाळून लावल्याने व हे सभासद निवडणुकीत मतदानास पात्र झाल्याने हा निर्णय म्हणजे सतेज पाटील गटासाठी मोठा धक्का असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
त्याचप्रमाणे विरोधी आघाडीकडून सौ.शौमिका महाडिक यांच्या संस्था गटातील ठरावाबाबत नोंदवलेला आक्षेपही प्रादेशिक सहसंचालकांनी फेटाळून लावल्याने विरोधी आघाडीची नामुष्की झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सदर 1899 सभासदांचा प्रश्न राजाराम कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलाच गाजला होता. अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देऊन कारखान्याचे संचालक अमल महाडिक यांनी सभासदांचे हक्क अबाधित ठेवले होते. त्यानंतर पुन्हा विरोधी आघाडीने याच सभासदांवर आक्षेप घेतल्याने सदर निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते.
सुनावणीदिवशीही मा.प्रादेशिक सहसंचालकांच्या कार्यालयाबाहेर सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली होती. यावेळी विरोधी आघाडीकडून नाहक त्रास दिला जात असल्याचे सांगत सभासदांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर अश्या पद्धतीने आक्षेप घेऊन सभासदांचा रोष ओढवून घेतल्याने, याचा फटका होऊ घातलेल्या निवडणुकीत सतेज पाटील गटाला बसणार हे निश्चित आहे.
ज्या पद्धतीने सप्तगंगा साखर कारखान्याचे 5000 सभासद एका रात्रीत कमी केले, आणि तिथला सहकार संपवून टाकला. त्याच पद्धतीने राजाराम कारखान्यातही सभासद कमी करून सत्ता घ्यायची आणि सहकार संपवायचा असाच आमच्या विरोधकांचा कुटील डाव होता. पण कोणत्याही परिस्थितीत राजाराम कारखान्याच्या सर्व सभासदांचे हक्क अबाधित ठेवायचेच या भावनेतून आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला होता. त्या लढ्याला आज पुन्हा एकदा यश आले म्हणायला हरकत नाही. या निःपक्षपाती निर्णयासाठी कारखान्याच्या सर्व सभासदांच्या वतीने मी मा.प्रादेशिक सहसंचालक(साखर) कोल्हापूर विभाग यांचे मनापासून आभार मानतो !
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विरोधी आघाडीने या सभासदांना त्रास देऊन त्यांचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी सत्याचाच विजय निश्चित असतो, यावर आजच्या निकालाने शिक्कामोर्तब झाले. सुप्रीम कोर्टानंतर आलेला आजचा निर्णय ही सुरुवात आहे. राजकीय द्वेषातून सहकाराच्या मुळावरच घाव घालू पाहणाऱ्या आमच्या विरोधकांच्या घातकी प्रवृत्तीला या निवडणुकीत राजाराम कारखान्याचे सभासद निश्चितपणे त्यांची जागा दाखवतील
मा.आ.अमल महाडिक.