वृत्तसंस्था / जयपूर
प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) राजस्थान प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 5 जणांना अटक केली आहे. हे प्रकरण राजस्थानात काँग्रेसच्या सत्ताकाळात घडले होते. शिक्षक भरतीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याने त्यावेळी मोठाच गोंधळ निर्माण झाला होता. या प्रकरणात काही अधिकाऱ्यांनी बेकायदेशीररित्या पैसा कमावल्याचा आरोप ईडीने ठेवलेला आहे.
या प्रकरणी शनिवारी सुरेश साऊ, विजय दामोरे, पीराराम, पुखराज आणि अरुण शर्मा अटक करण्यात आली आहे. नंतर त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांची तीन दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवणी केली आहे. राजस्थान लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य बाबूलाल कटारा, अनिलकुमार मीना आणि भूपेंद्र सरण यांना यापूर्वीच या प्रकरणात अटक झालेली आहे.
शिक्षकाची नोकरी मिळावी अशी इच्छा असणाऱ्या अनेक परीक्षार्थींकडून आरोपींनी प्रत्येक दोन लाख रुपये घेतला आणि त्यांना प्रश्नपत्रिका आधीच दिली. तसेच या फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची योग्य उत्तरे त्यांना शिकविण्यासाठी खासगी शिकवणीही घेतली, असा आरोप या आरोपींवर आहे. हा भ्रष्टाचार कोट्यावधी रुपयांचा असल्याची चर्चा असून पुढील तपास सुरु आहे.