नवव्या दिवशीही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात 20 याचिकांवर बुधवारी नवव्या दिवशी सुनावणी सुरू आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एस. के. कौल, न्यायमूर्ती रवींद्र भट, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या घटनापीठासमोर या प्रकरणावर युक्तिवाद सुरू आहे. या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्व राज्यांना पत्रे लिहिली असल्याचे सांगितले. त्यापैकी मणिपूर, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आसाम, सिक्कीम आणि राजस्थानमधून उत्तरे प्राप्त झाली आहेत. या उत्तरांमध्ये राजस्थानने स्पष्ट शब्दात नकार दर्शवला असून उर्वरित राज्यांनी चर्चेची गरज असल्याचे प्रतिपादन केले आहे.
समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आल्या असून त्यांच्यावर सुनावणी सुरु आहे. केंद्र सरकारने या याचिकांना विरोध केला आहे. अशा विवाहांना कायदेशीर मान्यता दिल्यास समाजाची घडी विस्कटून जाण्याची शक्यता आहे, असे मत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यापूर्वीच्या सुनावणींमध्ये व्यक्त केले आहे.
समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिल्यास समाजात समलिंगी प्रवृत्ती वाढण्याची शक्यता आहे. जी प्रवृत्ती वाढू नये यासाठी प्रयत्न करावयास हवेत तीच वाढली तर समाजाची त्यातून हानीच होईल. समलिंग वृत्ती ही विकृती असून ती समुपदेशनाने दूर केली जाऊ शकते, असेही मत अनेकांनी व्यक्त केले आहे. यासंबंधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेने एक देशव्यापी सर्वेक्षण केले असून त्यात बहुतेकांनी समलैंगिकता ही मानसिक विकृतीच आहे, असे मत व्यक्त केल्याचे प्रतिपादन संघाकडून करण्यात आले आहे. तसेच 57 टक्के डॉक्टरांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला विरोध केल्याचेही दिसून आले आहे.
या सर्वेक्षणानुसार समलैंगिक संबंधांमुळे गुप्तरोगांचा प्रसार अधिक वेगाने होतो, असे मत 83 टक्के डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. समलिंगी विवाह केलेले मातापिता आपल्या दत्तक घेतलेल्या अपत्यांचे पालन पोषण योग्यरित्या करु शकत नाहीत, असेही मत अनेक डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. या सर्वेक्षणात वैद्यकीय क्षेत्रांमधील तज्ञ, डॉक्टर्स, शास्त्रज्ञ, आधुनिक विज्ञातातील तज्ञ तसेच आयुर्वेद तज्ञांची मते जाणून घेण्यात आली आहेत. यांमधील बहुतेकांनी समलिंगी संबंधांना विरोध केला आहे. समलिंगी संबंध ही अनैसर्गिक आणि विकृत व्यवस्था आहे, असे मत बहुतेकांना व्यक्त केले आहे.