ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे वादग्रस्त विधानांवरून सातत्याने चर्चेत राहिले आहेत. पण आता त्यांना परतीचे वेध लागले आहेत. त्यांनी विविध प्रसंगी खासगीत तसेच जाहीर कार्यक्रमात तशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता गुजरात निवडणुकीनंतर त्यांची उत्तराखंडात पाठवणी होईल, अशी शक्यता आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यापूर्वी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि आता छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj )यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यपाल कोश्यारी हे चर्चेत आले होते. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांना हटवण्याची मागणी करण्यात येत आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोक सोडून गेले तर आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची तशी ओळख राहणार नाही, असे त्यांनी वक्तव्य केले होते. त्यासंदर्भात त्यांनी माफीदेखील मागितली. शिवाय, माध्यमांशी न बोलण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे खुद्द राज्यपाल कोश्यारी यांनीच सांगितले.
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी पुन्हा एकदा अशी इच्छा व्यक्त केल्याचे सांगितले जाते. याआधी ऑगस्ट महिन्यात त्यांना निवृत्ती हवी असल्याचे म्हटले होते. मला निवृत्त व्हायचे आहे, पण मी राज्यपालपदावर कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालपदावर सेवाभावी कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी, असे राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले होते. अहमदनगरमधील स्नेहालय संस्थेच्या वतीने युवा प्रेरणा शिबिरात बोलत असताना त्यांनी ही इच्छा व्यक्त केली होती. आता लवकरच त्यांची ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता असून ८ डिसेंबरला गुजरात निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर त्यांची पाठवणी होण्याची शक्यता आहे. पण, राजभवनाकडून या वृत्ताचे खंडण करण्यात आलं आहे.