अंबाबाई मंदिर परिसर विकासासंदर्भात राजेश क्षीरसागर यांची स्पष्टोक्ती; महाव्दार रोड व्यापारी, रहिवासी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
कोल्हापूर प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने जरी मंदिर परिसराचा विकास करण्याचे ठरविले असले तरी स्थानिक रहिवासी आणि व्यापारी यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, या सर्वांना विश्वासात घेऊनच मंदिर परिसर विकास केला जाईल, असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गुरूवारी स्पष्ट केले.
महाव्दार रोड व्यापारी, रहिवासी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने गुरूवारी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे आणि असोसिएशनचे अध्यक्ष शामराव जोशी यांच्या नेतृत्वाखाली क्षीरसागर यांची भेट घेवून त्यांना निवेदन सादर केले. जोशी यांनी निवेदन सादर करताना सांगितले की, मंदिर परिसरातील व्यापारी व रहिवासी नागरिकांना तीर्थक्षेत्र विकासासंदर्भात प्रशासनाकडून नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिक आणि व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे. मंदिर परिसर हा मुळचा गावठाण भाग असून, राजर्षी शाहू महाराजांनी सामान्य जनतेसाठी निर्माण केलेल्या बाजार पेठांमधील महाद्वार रोड ही बाजारपेठ कोल्हापूरचे हृदय आहे. त्यामुळे बाजार पेठेला धक्का न लावता अंबाबाई मंदिर परिसराचा विकास करावा. अंबाबाईच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांना सोई सुविधा मिळणे गरजेचेच आहे. पण कोणावरही अन्याय करून विकास करण्यात येवू नये. सर्वांना विश्वासात घेवून निर्णय व्हावा, अशी मागणी करत संघटनेचा विकासाला विरोध नसल्याचेही स्पष्ट केले.
राजेश क्षीरसागर यांनी तिरुपती, सिद्धिविनायक, शिर्डी या देवस्थानांच्या धर्तीवर अंबाबाई मंदिर परिसराचा विकास व्हायला हवा. मात्र हा विकास साधताना स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही, त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेऊनच कामांचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत. सुरुवातीला शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांची तपासणी करुन विकासासाठी ताब्यात घ्याव्यात, उर्वरित कामांसाठी गरज भासल्यासच खासगी जागांचा विचार व्हावा, अशा सक्त सूचना दिल्या आहेत. याविषयी व्यापारी, स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल. आवश्यकतेनुसार राज्यस्तरावर बैठकीसाठी प्रयत्न करण्यात येतील. अंबाबाई मंदिराचा विकास झाल्यास कोल्हापूरच्या अर्थचक्राला गती प्राप्त होणार आहे. यातून पर्यटन वाढीसह रोजगाराची संधीही निर्माण होणार आहे. पण, हे करताना कोणावरही अन्याय केला जाणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे सर्वाना विश्वासात घेवूनच हा निर्णय घेण्यात येईल, असे क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी डॉ.गुरुदत्त म्हाडगुत, संचालक राहुल नष्टे, राकेश माने, सागर कदम, दिलीप धर्माधिकारी, शुभला वणकुद्रे, अलका सुगंधी, प्रतिभा वाकरेकर आदी उपस्थित होते.