19 ऑगस्टला तिरुपती येथे होणार वितरण
प्रतिनिधी/कोल्हापूर
राष्ट्राच्या विकासासाठी केलेली गुणवत्तापुर्ण सेवा आणि योगदानाबद्दल मान्यवर व्यक्तींची राजीव गांधी महिला शक्ती, राजीव गांधी युवा शक्ती, राजीव गांधी सर्वोत्तम जिल्हा, सर्वोत्तम तालुका, सर्वोत्तम ग्रामपंचायत, ग्राम स्वराज व माहिती तंत्रज्ञान राष्ट्रीय पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानीत केले जाते. यावर्षीचा राजीव गांधी सर्वोत्कृष्ठ जिल्हा पंचायत पुरस्कार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल पाटील यांना जाहीर झाला आहे.19 ऑगस्ट रोजी हॉटेल ब्लिस (दरबार हॉल), तिरुपती येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे.
राजीव गांधी सर्वोत्तम जिल्हा पुरस्कारासाठी संशोधन संस्थेच्या कार्यप्रणालीनुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत केलेल्या कामकाजाच्या आधारे नामांकन केले असलेचे व विहित नमुन्यातील नामनिर्देशन फॉर्म सादर करावे असे संचालक डॉ. डी. सुंदर राम यांनी कळविलेले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने ऍकॅडमी ऑफ ग्रासरूटस् स्टडीज ऍन्ड रिसर्च ऑफ इंडीया तिरूपतीकडे हा प्रस्ताव दाखल केला होता.
जिल्ह्याच्या वाढीसाठी केलेली विकास कामांचे नियोजन व अंमलबजावणी, नेतृत्वगुण, ग्रामीण भागामध्ये आर्थिकदृष्टया मागासलेल्या लोकांच्या साठी राबविलेले शासकीय योजना व नाविन्यपूर्ण उपक्रम, जिल्हा परिषदेचे सभा कामकाज, तालुकास्तरावरील भेटी व विविध बैठकांना उपस्थिती, महिला सक्षमीकरणासाठी राबविलेले योजना, शाळामधील शैक्षणिक दर्जा सुधारणे व मुलांची उपस्थिती वाढीसाठी केलेले प्रयत्न, सुशासन, आरोग्य व शिक्षणासाठी केलेले कामकाज आणि योगदान या आधारे राष्ट्रीय स्तवरावरील हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.